

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्पही 'मेड इन इंडिया' असून अद्वितीय आहे. यासाठी मी कोची शिपयार्डचेही अभिनंदन करतो. वॉटर मेट्रोमुळे कोचीच्या आसपासच्या अनेक बेटांवर राहणाऱ्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होण्यास मदत होईल. बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. केरळच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेला कोची वॉटर मेट्रोचे (Kochi Water Metro) पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.२५) लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते.
कोची वॉटर मेट्रो ही केवळ देशातील पहिली जल मेट्रो नाही. तर ती आशियातील पहिली एकीकृत जल वाहतूक व्यवस्था आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर केरळमधील ३ हजार २०० कोटींहून अधिक विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
कोची वॉटर मेट्रोची (Kochi Water Metro) उभारणी करण्यासाठी 1,136.83 कोटी खर्च आला आहे.
या प्रकल्पाला केरळ सरकारकडून निधी आणि केएफडब्ल्यू (KfW) या जर्मन सरकारी गुंतवणूक आणि विकास बँकेकडून कर्ज मिळाले आहे.
पहिल्या टप्प्यात हायकोर्ट ते वायपिन आणि व्हिटिला ते कक्कनड या मार्गावर वॉटर मेट्रो सेवा सुरू होईल.
हायकोर्ट ते वायपिन असा प्रवास फक्त 20 मिनिटांत आणि कक्कनाड ते व्हिटिला हा 25 मिनिटांत करता येणार आहे.
तिकिटाची किंमत फक्त 20 रूपये इतकी आहे.
साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक पास प्रवासांना घेता येणार आहेत.
कोची वन कार्डचा वापर कोची मेट्रो आणि कोची वॉटर मेट्रो या दोन्हींवर अखंडपणे प्रवास करण्यासाठी केला जाऊ शकतो.
कोची वन अॅपद्वारे डिजिटल पद्धतीने तिकीट मिळू शकते.
KWM च्या बोटी कोचीन शिपयार्ड येते बांधल्या जात आहेत. त्या पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, 10 बेटांवर 38 टर्मिनल्स दरम्यान 78 बोटी धावतील.
बोटी अॅल्युमिनियम कॅटामरन हल्स आणि एफआरपी सुपरस्ट्रक्चरने बनलेल्या आहेत.
बोटी लिथियम टायटेनेट ऑक्साईड बॅटरीने सुसज्ज आहेत.
अत्याधुनिक ऑपरेटिंग कंट्रोल सेंटरमधून या बोटींचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाऊ शकते.
गेल्या वर्षी कोची वॉटर मेट्रोने जगातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक प्रवासी इलेक्ट्रिक बोटसाठी प्रतिष्ठित गुसीज पुरस्कार (फ्रान्स) जिंकला.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे बेटवासीयांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. वाहतूक व्यवस्था अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरत असल्याने ती टिकाऊ आहे. बोटीची रचना एका अनोख्या पद्धतीने केली गेली आहे. जी नगण्य लहरी क्रियाकलाप सुनिश्चित करते आणि एक्वा वनस्पती आणि जीवजंतूंना त्रास देत नाही. कोची वॉटर मेट्रोमुळे दरवर्षी ४४ हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात ३४ हजार प्रवासी वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील, असेही ते म्हणाले.
हेही वाचा