विषारी टॉफी खाल्ली अन् ४ बालकांचा तडफडून मृत्यू | पुढारी

विषारी टॉफी खाल्ली अन् ४ बालकांचा तडफडून मृत्यू

लखनौ : उत्तर प्रदेश येथील कुशीनगर मध्ये टॉफी खाल्ल्यानंतर चार लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. या टॉफीमध्ये एवढे जहाल विष होते की, त्यावर बसलेल्या माश्यासुद्धा क्षणार्धात मृत्युमुखी पडल्या.

या मुलांची आई रसगुल यांनी सांगितले की, मुले सकाळी घराबाहेर खेळत होती तेव्हा तिथे चार टॉफी पडल्या होत्या. घरातील लोकांनी त्या पाहिल्या आणि नंतर मुलांना दिल्या. पण टॉफी खाताच मुले बेशुद्ध पडली आणि इस्पितळात नेत असताना वाटेतच गतप्राण झाली.

गावकर्‍यांनी याबाबत तीन जणांवर संशय व्यक्त केल्यानंतर तिन्ही संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मंझना (7), स्वीटी (5), समर (3) आणि आयुष (5) अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. राज्यमंत्री राजेश्‍वर सिंग यांनी घटनास्थळी जाऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. एका वर्षापूर्वी रसगुल यांच्या बहिणीच्या घरी अशाच पद्धतीने चार मुलांचा मृत्यू झाला होता. त्या आधी चार वर्षांपूर्वी रसगुल यांचा भाऊ आणि वहिनी यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. दोघेही तेव्हा बचावले होते. या नव्या घटनेमागेही घातपात असू शकतो,असा पोलिसांना संशय आहे.

Back to top button