Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात; नागपुरातील तिघांचा मृत्यू | पुढारी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात; नागपुरातील तिघांचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जालना-समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. एका कारचे नियंत्रण सुटून भरधाव कार महामार्गावर बाजुला उभ्या कंटेनरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात नागपुरातील तिघांचा मृत्यू झाला.

निधोना येथे घडलेल्या अपघातात रामोजी शिवराज तिजारे (५०), मालुबाई पुरी (७०), शांताबाई पुरी (४५) अशी मृतांची नावे आहेत. मृत सर्वजण नागपुरातील जगनाडे चौक परिसरातील रहिवासी आहेत. मालुबाई पुरी आणि शांताबाई पुरी या मायलेकी गुरुवारी (दि. ८) सायंकाळी अहमदनगर येथे धार्मिक विधीसाठी रामोजी शिवराज तिजारे यांची कार घेऊन गेल्या होत्या. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मालुबाई, शांताबाई, रामोजी व त्यांचा मुलगा सूरज तिजारे (२२) हे कारने नागपूरकडे परत येत होते. याचवेळी निधोना शिवारात चालक रामोजी तिजारे यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गावर बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. यात तिघेही जागीच ठार झाले, तर सूरज गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्यास रुग्णालयात हलविले आहे. आज या तिघांचे पार्थिव नागपुरात आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, या अपघातास कंटेनर चालकही जबाबदार असल्याचे लक्षात आल्यावर त्यालाही अटक करण्यात आली. मागील आठ दिवसात सिंदखेडराजा व करमाड दरम्यान तीन अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Back to top button