सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला; राज्यात वर्षभरात १०० कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक | पुढारी

सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला; राज्यात वर्षभरात १०० कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या वर्षात संपूर्ण देशात तब्बल ८० हजारांहून अधिक ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या असून त्यापैकी १८ टक्के गुन्हे हे महाराष्ट्रात घडले आहेत. या गुन्ह्यांमधून भामट्यांनी तब्बल १०० कोटीपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक केली आहे.
कॅशलेस व्यवहार करण्यावर शासन भर देत असले तरी कॅशलेस व्यवहारामुळे अनेकांना फटका बसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगत तसेच इतर मार्गांनी काही भामटे भोळ्याभाबड्या जनतेला गंडवतात. विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात तब्बल ८० टक्के गुन्ह्यांचा उलगडाच होत नसल्याचे दिसून येते.

आधुनिक टेक्नोलॉजीच्या या जमान्यात सध्या प्रत्येकाच्या हातात अँड्रॉईड फोन आले आहेत. या फोनमुळे अनेक कामे सोपे व सोयीची झाली आहेत; मात्र फोनचे जसे फायदे आहेत तसेच नुकसान देखील आहेत. मी तुमच्या खाते असलेल्या बँकेतून बोलतोय हा कॉल्स तुमच्या खात्याची माहिती पडताळणीसाठी करण्यात आला आहे. मला तुमचे खाते क्रमांक आणि क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड, पीन क्रमांक द्यावे लागेल किंवा तुमचे वीज कनेक्शन कापण्यात येणार असल्याचे मेसेज काही चोरटे नागरिकांना पाठवत आहेत. वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये म्हणून आम्हाला कॉल करा असे या मॅसेज नमूद करण्यात येऊन एक संपर्क क्रमांक तेथे दिलेला असतो. या क्रमांकावर फोन केल्यास एक अँप डाऊनलोड करावे लागतील, सांगून हे अँप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्या माध्यमातून नागरिकांच्या फोनचा ऍक्सेस घेऊन त्याद्वारे संपूर्ण बैंक खाते रिकामे केले जाते. अशा अनेक फसवणुकीच्या नवनवीन आयडिया सायबर चोरटे शोधून काढतात आणि नागरिकांना गंडवतात. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांच्या हाती बैंक खात्याची माहिती लागली की हे भामटे ऑनलाईन बँकिग द्वारे खात्यातील पैशांची अफरातफर करतात. बँकेची माहिती मिळवणाऱ्या व्यक्तींची गोड बोलण्याची पद्धत, इंग्रजीचा भडीमार, आणि आपले म्हणणे पटवून देण्याचे कसब या मुळे कुणीही व्यक्ती सहजच त्यांच्या भूलथापांना बळी पडतो.

फोनवरून बँक खात्याची माहिती देऊ नका

फोनवरून बँक खात्याची माहिती देऊ नका तुमच्या बँक खात्याची माहिती फोनवरून कोणालाही देऊ नका. कारण बँकेतून कोणीही फोन करून माहिती मागत नाही. त्यामुळे बँकेच्या नावाने फोन करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आम्ही तुमच्या बँकेतून बोलत असून तुमचे डेबिट / एटीएम कार्ड लॉक करण्यात आले आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुमच्या कार्डवरील क्रमांक आणि पासवर्ड द्या, अशा भूलथापा मारून नागरिकांच्या खात्यातून ऑनलाईन पैसे चोरण्याच्या घटना ठाण्यात खूप वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहून आपल्या बँक खात्याची माहिती फोन वरून कोणाला ही देऊ नये, असे आवाहन केले आहे.

राज्यात १८ टक्के गुन्हे

गेल्या वर्षात संपूर्ण देशात तब्बल ८० हजारांहून अधिक ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या असून त्यापैकी १८ टक्के गुन्हे हे महाराष्ट्रात घडले आहेत. या गुन्ह्यांमधून भामट्यांनी तब्बल १०० कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गुन्हे देशात घडल्याची ही पहिलीच वेळ आहे. तर येत्या काळात अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

Back to top button