प्रभाकर देशमुख शब्द न पाळणारा नेता : शेखर गोरे | पुढारी

प्रभाकर देशमुख शब्द न पाळणारा नेता : शेखर गोरे

दहिवडी : पुढारी वृत्तसेवा
दहिवडी नगरपंचायती संदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आम्हाला दोन वेळा दिलेला शब्द पाळला नाही. तालुक्यात शब्द न पाळणारा नेता म्हणून आपली ओळख होवू नये, यासाठी तरी त्यांनी यापुढील काळात काम करावे, असा सल्ला शिवसेनेचे युवानेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला. दरम्यान, आगामी निवडणुकात आमचे मार्ग मोकळे असून मार्केट कमिटी, दहिवडी नगरपंचायतीप्रमाणे पुन्हा एकदा शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रभाकर देशमुख  यांनी दिलेले शब्द पाळले नाहीत

शेखर गोरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, दहिवडी नगरपंचायतीत अपक्ष उमेदवार हा आमच्या विचाराचा होता. त्यामुळे आम्ही त्याविरोधात उमेदवार दिला नाही. निवडीनंतरही अपक्ष उमेदवाराने आमच्याशी संपर्क साधला होता. सध्या ते राष्ट्रवादीच्या बरोबर असले तरी नगरपंचायतीच्या सत्तेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही अपक्ष नगरसेवकाशी संपर्क साधला होता. यादरम्यान राष्ट्रवादीने मला अडकवण्यासाठी खोट्या अपरहणाचे नाटक केले. वास्तविक आमच्या चर्चेनंतर मी स्वत: त्या नगरसेवकाला माघारी सोडले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्याशीही आमची चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी नगरपंचायत संदर्भात आपल्याला पहिला शब्द दिला होता. त्यानंतर दुसर्‍या बैठकीत आगामी निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात तसेच नगरपंचायती संदर्भातला दुसरा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी आम्हाला दोनवेळा दिलेले शब्द पाळले नाहीत. तालुक्यात शब्द न पाळणारा नेता म्हणून आपली ओळख होवू नये यासाठी तरी त्यांनी यापुढील काळात काम करावे हा आमचा सल्ला राहील. आगामी जि.प., पं.स., म्हसवड नगरपालिका एकत्र लढवण्यासंदर्भात आम्ही विचार करत होतो. मात्र शब्द न पाळणार्‍या लोकांसोबत जाण्यापेक्षा स्वबळावर लढलेले बरे. मार्केट कमिटी, दहिवडी नगरपंचायतप्रमाणे पुन्हा एकदा शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असेही शेखर गोरे म्हणाले.

शेखर गोरे पुढे म्हणाले, आपली राज्यात सत्ता आहे. एकविचाराने राहिलो तर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यावर वर्चस्व मिळवू शकतो. यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यासाठी सकारात्मक होतो.प्रभाकर देशमुख दिलेला शब्द पाळतील असे वाटत होते. परंतु स्वत: राजकारणात काहीच करत नाहीत आणि कुणाला काही करून देत नाहीत. बगलबच्चे व भुरट्यांच्या ऐकण्यावरून देशमुखांनी दिलेला शब्द फिरवला. मार्केट कमिटीलाही आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र याच भुरटे व बगलबच्यांचे ऐकून शिवसेनेला कमी लेखण्याची चूक त्यांनी केली होती. सत्तेपासून दूर राहण्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. माण तालुक्यात शिवसेनेला कमी समजणार्‍यांना मार्केट कमिटी व दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे हे शिवसेना ठरवू शकते. तेवढी ताकद आम्ही निमार्र्ण केली आहे. दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना पॅनेल टाकू शकत नाही, अशी चर्चा होती. त्याच भीतीने आमच्या काही प्रमुखांनी आमची साथ सोडली. आपण उशीरा का होईना पण नगरपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नवख्या युवकांना बरोबर घेत फळी उभी करून अगदी शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली.पाच जागा लढवत तीन जागांवर यश मिळवले. एक उमेदवार फक्त वीस मतांनी पराभूत झाला आहे. दहिवडीतील दिग्गज नेतेमंडळींना आमच्या शिलेदारांनी पराभूत केले, तर काहींना घाम फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेची काय ताकद आहे ते सर्वांना समजले आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍यांना सत्ता स्थापनेत आमच्या मदतीचा व दिलेल्या शब्दांचा विसर पडला असून आगामी निवडणुका व नगरपंचायतीत येणार्‍या काळात शिवसेना पुन्हा आपली ताकद दाखवून देईल, असा इशाराही त्यांनीदिला.

राष्ट्रवादीचे तीन उमेदवार शिवसेनेमुळे नगरसेवक

नगरपंचायत निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांना सर्व बाजूने ताकद दिली होती. शिवसेनेमुळेच ते आज नगरसेवक आहेत. आमची मदत नसती तर ते आज नगरसेवक नसते. त्या तीन नगरसेवकांचा जर आपण फक्त राष्ट्रवादीमुळेच जिंकलोय असा भ्रम झाला असेल तर त्यांचाही हा शेवटचा गुलाल असेल. त्यांनी राजीनामा देऊन फक्त पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असा इशाराही शेखर गोरेंनी दिला.

आमच्यावर ट्रॅप लावणारे जन्माला यायचे आहेत

दहिवडी नगरपंचायतीच्या सत्तेसंदर्भात आम्ही अपक्ष नगरसेवकाशी चर्चेसाठी संपर्क केला होता. राष्ट्रवादीच्या लोकांनी या चर्चेला अपहरणाचे स्वरूप आणत आमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अपहरणाचं नाटक करून आमच्यावर ट्रॅप लावणारे अजून जन्मायचे आहेत. त्यांनी व त्यांच्या बगलबच्यांनी ती स्वप्नेही पाहू नयेत. सर्वांना पुरून उरणारी आमची औलाद आहे. आम्ही एक तर कोणाच्या वाटेला जात नाही आणि एखादा आमच्या अंगावर आलाच तर त्याला सोडतही नाही, असेही शेखर गोरे म्हणाले.

पाहा व्हिडिओ : उत्पल पर्रिकरांबाबत भाजपला काय वाटते? देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत | Goa Assembly Elections

Back to top button