Sangli : शेतीमालाची सांगलीत आवक घटली
सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील वसंतदादा मार्केट यार्डात गेल्या सप्ताहात बहुतेक शेतमालाची आवक घटली. मात्र दर स्थिर होते. मार्केट यार्डात रवे गुळाची 8 हजार 758 क्विंटल आवक झाली. गेल्या सप्ताहापेक्षा 958 क्विंटलने आवक कमी आहे. भेलीमध्ये 32 हजार 899 क्विंटल आवक झाली. तसेच गुळाला किमान दर तीन हजार 200 रु. तर कमाल तीन हजार 945 रु. क्विंटल मिळाला. बॉक्स मधील गुळाची आवक झाली नाही.
तसेच सप्ताहात मिरचीची आवक झाली नाही. सोयाबीनची जेमतेम 125 क्विंटल आवक झाली. किमान दर 5741 तर कमाल 6 हजार 275 प्रति क्विंटल आहे. परपेठ हळदीची आवक 252 क्विंटल झाली. किमान 8 हजार रु. तर कमाल 7 हजार 600 रु. प्रति क्विंटल राहिला. या सप्ताहात राजापुरी हळद आवक झाली नाही. बेदाण्याची 23 हजार 777 क्विंटल आवक झाली. किमान दर 4 हजार रु. तर कमाल दर 22 हजार 250 रु. मिळाला. मागील आठवडाभरात पावसामुळे येथील वसंतदादा मार्केट यार्डात शेतीमालाच्या आवकेत घट झाली होती.
भाज्यांची आवक घटली
गेल्या महिन्यापासून जिल्ह्याच्या बहुतेक भागात पाऊस असल्यामुळे भाज्यांची आवक घटलेली आहे.विशेषता फळभाज्यांची आवक घटलेली होती. आवक घटल्याने किंमतीत वाढ झालेली होती.
गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. अनेक भाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे आवक घटल्याने दर किंचित वाढले आहेत. पालक, मेथी, कोथिंबीर, तांदळ या भाज्या दहा रुपये आहेत. कोबी, फ्लॉवर दहा ते तीस रुपयास आहे. वांगी, दोडका, कारले या भाज्या 60 ते 80 रुपये प्रति किलो आहेत. टोमॅटो दर 10 रुपयापर्यंत दर खाली आला आहे. बटाटा 30 रुपये तर कांदे 20 ते 25 रुपये किलो आहेत. लिंबू दर कमी झालेले आहेत.