मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत: अजित पवार | पुढारी

मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत: अजित पवार

रायगड : पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारे, विधीमंडळात जोरदार आवाज उठवणारे निर्भिड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात की, मीनाक्षीताई यांचे संपूर्ण कुटुंबंच शेतकरी कामगार पक्षाशी जोडले गेले आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे संस्कार झाले. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन मोर्चे, आंदोलनं केली. त्यांचे जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होते. अलिबाग विधानसभेचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. सन 1999 साली तत्कालिन विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्या कार्यरत होत्या.

परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या मीनाक्षीताईंच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाटील कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button