बिमस्टेक देशांचे एकमेकांना सहकार्य : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

आपत्तीकाळातील मदतीचे प्रात्यक्षिक दाखवताना जवान. (छाया : यशवंत कांबळे)
आपत्तीकाळातील मदतीचे प्रात्यक्षिक दाखवताना जवान. (छाया : यशवंत कांबळे)
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'नैसर्गिक आपत्तीच्या वेळी 'बिमस्टेक' सदस्य देश एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सर्व सदस्य राष्ट्रांना भारताचे प्रादेशिक सहकार्य असते. इथून पुढेही संकटाच्या काळात सर्व सदस्य देशांना समर्थन आणि मदत करण्याचा भारताचा प्रयत्न राहील,' असे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिले.

'पॅनेक्स 21' या उपकरण प्रदर्शनात मंगळवारी शस्त्रास्त्रांची पाहणी करताना राजनाथ सिंह.
'पॅनेक्स 21' या उपकरण प्रदर्शनात मंगळवारी शस्त्रास्त्रांची पाहणी करताना राजनाथ सिंह.

पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) आयोजित 'पॅनेक्स-21' कार्यक्रमानंतर ते बोलत होते. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींमध्ये आपत्तीकाळात कशी मदत करायची याबाबतचा सराव झाला. हा सराव पुण्यात 20 ते 21 डिसेंबरला झाला, तर समारोप मंगळवारी झाला. या कार्यक्रमाला राजनाथ सिंह उपस्थित होते. या पूर्वी त्यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पॅनेक्स 21' या उपकरण प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या वेळी देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल विक्रमसिंग, 'फिक्की'च्या संरक्षण व अवकाश समितीचे सहअध्यक्ष अरुण रामचंदानी उपस्थित होते.

राजनाथ सिंह म्हणाले, 'अलीकडच्या दशकांमध्ये देशाने चक्रीवादळ, त्सुनामी, भूकंप, पूर आणि कोरोना यांसारख्या आपत्तींची मालिका पाहिली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि विनाश घडला. परंतु या काळात 'बिमस्टेक' राष्ट्रांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. या प्रकारच्या उपक्रमामुळे जमीन आणि सागरी प्रदेशांचे रक्षण करण्याची क्षमता वाढवणे, शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कार्य करणे शक्य होते. 'देशांच्या सुरक्षिततेबाबत प्रत्येक घटकाकडे समान लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ब्लू इकॉनॉमी, नैसर्गिक आपत्ती, दहशतवाद यांसारख्या अपारंपरिक धोक्यांना सामोरे जाण्यासाठी 'पॅनेक्स'सारख्या सामूहिक कृतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. मानवनिर्मित संकटे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे हा बिमस्टेकचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे,' असेही ते म्हणाले.

भूकंप झाल्यावर उद्ध्वस्त गावात पोहोचली तातडीची मदत

भूकंप, आग लागणे यासारखी नैसर्गिक आपत्ती घडल्यास त्याला कसे सामोरे जायचे आणि त्यामध्ये आपत्ती दल कसे काम करते, याचे प्रदर्शन या वेळी दाखवण्यात आले. त्यासाठी सीएमईच्या मैदानावर एक गाव दाखवले गेले. त्यात भूकंप झाल्यावर पोलिस, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, स्वयंसेवी संस्था कसे मदत व बचाव कार्य करतात, हे दाखवण्यात आले. यासाठी विशेष गाव वसविण्यात आले. मैदानावर सुभाषनगर व गांधीनगर गावांमधून इंद्रायणी नदी वाहत असल्याचे दाखविण्यात आले. त्यांचे एकमेकांना जोडणारे पूल, इमारती, घरे, दुकाने यांची निर्मिती करण्यात आली होती. भूकंप झाल्यावर तुटलेला पूल, पडलेली घरे व जखमी झालेले नागरिक, नदीत अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोलिस, आरोग्य, तसेच आपत्ती व्यवस्थापनाने केलेली मदत दाखविण्यात आली.

आपत्ती निवारण दलांच्या एकत्रित प्रयत्नांनी सुटका

पूल तुटलेला असल्याने आपत्तीग्रस्त गावात जाण्यासाठी लष्कराने लोखंडी पूल टाकून दळणवळण सुरू केले; तसेच रस्ते ब्लॉक झाल्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मशिन, पुलाचे साहित्य, औषधे पुरविण्यात आली. आग लागल्यावर हेलिकॉप्टरद्वारे ती आटोक्यात आणण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. आपत्तीच्या परिस्थितीत सशस्त्र दल आणि देशातील इतर प्रमुख आपत्ती निवारण एजन्सींच्या संसाधनांचा एकत्रित वापर केल्याने अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली.

स्वदेशी वाहनांनी लष्कराचे सामर्थ्य वाढले : मनोज नरवणे

'आर्म्ड इंजिनिअर रिकनायझन्स व्हेइकल (एईआरव्ही) या स्वदेशी बनावटीच्या बहुउपयोगी वाहनांचा समावेश लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लष्कराचे सामर्थ्य वाढले आहे,' असे मत देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीईजी येथे 'आझादी का अमृतमहोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही 'एईआरव्ही' वाहनांचा लष्करप्रमुख नरवणे यांनी झेंडा दाखवून लष्कराच्या ताफ्यात समावेश केला. ही वाहने लष्करी यंत्रणेला एखाद्या ठिकाणच्या भूपृष्ठाच्या आतील विविध माहिती तांत्रिक गोष्टींचा वापर करून पुरवू शकतात.

नरवणे म्हणाले की, नेक्स्ट जनरेशन आर्मर्ड व्हेईकल लष्करात औपचारिक स्वरूपात दाखल करून घेताना आनंद होत आहे. या बदलत्या युद्धक्षेत्रात नव्या क्षमता आणि नवीन उपकरणांमुळे सैन्यदलाची ताकद वाढली आहे. त्याचबरोबर जवानांचे मनोबलही उंचावले आहे.
ही वाहने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या लष्कराच्या सामरिक संशोधन करणार्‍या संस्थेने विकसित केली आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरी मेडक आणि भारत इलेक्ट्रॉनिक पुणे यांनी त्यांचे उत्पादन केले आहे. म्हणून ही वाहने पूर्णपणे स्वदेशी आहेत. त्याबाबत नरवणे यांनी समाधान व्यक्त केले.

ते म्हणाले, " काही महिन्यांपूर्वी डीआरडीओने विकसित केलेले 'शॉर्ट स्पॅन बि—जिंग सिस्टिम' हे वाहन लष्करात दाखल करून घेतले होते. संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दिशेने जाणारे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे." सैन्याच्या आधुनिकीकरणात डीआरडीओ आणि भारत इलेक्ट्रॉनिकने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, असेही नरवणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news