वरंध घाट आजपासून आठ दिवसांसाठी खुला ! | पुढारी

वरंध घाट आजपासून आठ दिवसांसाठी खुला !

भोर : पुढारी वृत्तसेवा : दि. 1 एप्रिल ते 30 मे या कालावधीत सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी वरंध घाट बंद करण्यात आला होता; मात्र निवडणूक, लग्नसराई व सुटीच्या हंगामामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवार (दि. 1 मे) पासून 8 दिवसांसाठी म्हणजेच 8 मेपर्यंत हा घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे महाड-भोर-पुणे-पंढरपूर मार्गावरून प्रवाशांना वरंध घाटातून प्रवास करता येणार आहे.

वरंध घाटामध्ये रस्ता दुपदरीकरणाचे व घाटामध्ये संरक्षक भिंती बांधण्याचे काम सुरू असल्याने वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्द येथील वाहतूक बंद करण्याचा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रवाशांना ताम्हिणी घाटमार्गे तसेच आंबेनळी घाटमार्गे प्रवास करावा लागत होता. महाडमार्गे भोर, पुणे, पंढरपूर, फलटण या भागांत जाण्यासाठी वरंध घाटातून प्रवास करावा लागतो. महाड-वरंध घाट भोरमार्गे पुणे हा सुमारे 120 किलोमीटरचा रस्ता असून, पुणे येथे जाण्यासाठी हा सर्वांत जुना व जवळचा मार्ग आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता 30 मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता.

महाड-दापोली मंडळ रस्ता सोयीचा पडत असेल; परंतु रस्ता बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. सध्या पारमाचीवाडीजवळ संरक्षक भिंती व रुंदीकरणाचे काम केले जात आहे. या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहतूक सुरू ठेवून हे काम करणे कठीण असल्याने येथील वाहतूक बंद करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हा प्रशासनाला कळविले होते.

हेही वाचा

Back to top button