उष्णतेमुळे विजेची मागणी ५ हजार मेगावॅटने वाढली! | पुढारी

उष्णतेमुळे विजेची मागणी ५ हजार मेगावॅटने वाढली!

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात उष्णतेची लाट अतितीव्र झाल्याने विजेची मागणी तब्बल ५ हजार मेगावॅटने वाढली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेने दिवस-रात्र पंखे व कुलर सुरू ठेवल्याने हा भार महावितरणवर पडला आहे. ते २२ हजार मेगावॅट इतकी विजेची गरज भासते. दरवर्षीच्या उन्हाळ्यात साधारणपणे १००० ते १२०० मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज वापरली जात होती. मात्र, यंदाचा उन्हाळा महाउष्ण असल्याने २४ तास पंखे आणि कुलरचा वापर सुरू आहे.

प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांत ही मागणी जवळपास दुपटीने वाढली आहे; कारण यंदा मार्च ते एप्रिल असे सलग ६० दिवस उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनचा पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारी २०२४ पासूनच विजेची मागणी वाढली आहे. मार्च महिन्यात ती १५०० मेगावॅटवर पोहोचली होती. एप्रिल महिना सुरू होताच ती २००० ते २२०० मेगावॅटवर पोहोचली. ३० एप्रिल रोजी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विजेची मागणी वाढली असून, ती २४ हजार ८६० मेगावॅटवर गेली आहे. पुढील काही दिवसांत ती आणखी एक ते दीड हजार मेगावॅटने वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वीजनिर्मिती आणि उपलब्धता (मेगावॅट)

  • एमएसपीजीएसएल थर्मल : ७७८५
  • एनटीपीसी : ४४१४
  • एपीएमएल : २६०८
  • जेएसडब्ल्यू : २७०
  • सीजीपीएल : ५९०
  • सोलार : २५५८
  • को-जनरेशन : ३४९
  • एनपीसीआयएल : ६८२
  • एमएसजीजीसीएल (गॅस) : २६१
  • आरआयपीएल : १३३०
  • ईएमसीओ : १९३
  • साई वर्धा : २४०
  • पवनऊर्जा : ४१२
  • कोयना : ८९३

इतर: १४०८

एकूण : २३,९९३ मेगावॅट

हेही वाचा

Back to top button