पुणे : लोकशाहीसाठी कायद्याची भूमिका महत्त्वाची : रामराजे नाईक निंबाळकर यांचे मत | पुढारी

पुणे : लोकशाहीसाठी कायद्याची भूमिका महत्त्वाची : रामराजे नाईक निंबाळकर यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘लोकशाहीच्या बळकटीसाठी कायद्याची भूमिका महत्त्वाची आहे. या देशात कायदा सर्वश्रेष्ठ आहे. अशा वेळेस कायद्याचे शिक्षण घेणार्‍या युवकांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी चांगल्या उद्देशाने राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा,’ असे मत विधान परिषदेचे सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

माईर्स एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विधी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, विधी महाविद्यालयाच्या प्रमुख डॉ. पौर्णिमा इनामदार आदी उपस्थित होते.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ‘संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार प्रत्येकाने स्वीकारावा. महाराष्ट्राची विधान परिषद ही सर्वोत्तम काम करणारी आहे. वर्तमानकाळात लोकहिताचे कायदे व धोरण बनवून त्यांचे पालन करावे.’ राहुल कराड म्हणाले, ‘देशापुढे जातीयता, गुन्हेगारी, सामुदायिक कलह आणि भ्रष्टाचार हे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यासाठी कडक कायदे करणे व त्यावर अंमलबजावणी करणे
गरजेचे आहे.’ प्रा. डॉ. चयनिका बासू यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिजित ढेरे यांनी आभार मानले.

Back to top button