पुणे विभागातील फायलींना गती देणार : मुख्यमंत्र्यां एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन | पुढारी

पुणे विभागातील फायलींना गती देणार : मुख्यमंत्र्यां एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या अडकलेल्या विकासकामांच्या फायली वेगाने निकाली काढा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विकासकामांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या.

तीर्थक्षेत्र विकास, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, रिंगरोड, पुणे महानगर विकास प्राधिकरण, शहरातील खड्डे व पिकांचे पंचनामे यांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी घाईत संवाद साधला. प्रचंड बंदोबस्तात पुण्याच्या विभागीय आयुक्‍तालयात शिंदे यांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील विकासकामांचा आढावा घेतला. सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आढावा बैठक सुरू होती. या वेळी विभागीय आयुक्‍तालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होेते. कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

फायलींचा वेग वाढवणार

माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, मी विभागवार आढावा बैठकांचे सत्र सुरू केले असून, त्यातील ही तिसरी बैठक आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे, शेतकर्‍यांसाठी दिली जाणारी मदत, पेरणी आढावा, कर्ज वाटप, धरणांतील पाणीसाठा, सिंचनक्षमता, कोरोनाची स्थिती, बूस्टर डोस आदी विषयांचा आढावा घेतला. पाचही जिल्ह्यांतील विकासकामांच्या अडकलेल्या फायलींना गती कशी देता येईल, यासंदर्भात अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. फायलींचा प्रवास कमी करण्यावर माझे लक्ष असून, त्याचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल.

सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटन विकास, मेढा-केळघर येथील पुलाचे काम, प्रतापगड परिसर विकास, शिखर-शिंगणापूर विकास आदींबाबत या वेळी आढावा घेण्यात आला. गणेशोत्सव उत्साहाने साजरा होईल, यादृष्टीने प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वयाने नियोजन करावे. सण-उत्सवाच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल आणि शांततेत सर्व उत्सव पार पडतील, याविषयी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

दोन दिवसांत पंचनामे

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे केले जात असून पुढील दोन दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण होतील. एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकर्‍यांना मिळणारी नुकसानभरपाई कमी आहे. ती कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

‘ते’ पैसे माझ्या घरात सापडले काय?

खासदार संजय राऊत यांच्या घरात ईडीला जी रक्‍कम सापडली; त्यावर एकनाथ शिंदे असे नाव होते. ते पैसे तुम्ही दिले होते का, असा प्रश्?न विचारला असता शिंदे म्हणाले, जे पैसे सापडले आहेत. ते कोणाच्या घरात सापडले, ते त्यांनाच विचारा, मी कसे उत्तर देणार?

आदित्य ठाकरेंच्या प्रश्?नावर उत्तर टाळले

तुम्ही ज्या भागात जाणार आहात, त्याच भागात शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची सभा आहे? या प्रश्?नावर शिंदे म्हणाले, लोकशाही आहे. प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी अधिक उत्तर देणे टाळले.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, असे दोघे मिळून किती दिवस सरकार चालणार? या प्रश्?नावर मुख्यमंत्री म्हणाले, लोकांची कामे होताहेत ना? आमच्या कामावर जनता खूश आहे. त्यामुळेच आमचा सत्कार होतोय. आम्ही शेतकर्‍यांवर लक्ष केंद्रित केले असून दिवसरात्र काम करीत आहोत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

Back to top button