पाच तास झटून त्यांनी केली रुक्मिणीमातेची चरणसेवा | पुढारी

पाच तास झटून त्यांनी केली रुक्मिणीमातेची चरणसेवा

आशीष देशमुख

पुणे : “आम्ही रात्री बारा वाजता रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यात प्रवेश केला. या ठिकाणचे वातावरण एका सकारात्मक ऊर्जेने भारलेले असल्याने थकवा आलाच नाही. मातेच्या पावलांची खूप झीज झालेली होती. रात्रीच्या निरव शांततेत आम्ही कामाला लागलो ते पहाटेचे पाच कधी वाजले, ते कळलेच नाही. पावले जेव्हा पूर्ववत झाली तेव्हा आम्हा सर्वांना रखुमाईची मनोभावे सेवा केल्याचे भाग्य लाभले. हा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे…” हे शब्द आहेत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या विज्ञान विभागाच्या पथकाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांचे. केंद्राच्या या टीमचे प्रमुख कार्यालय औरंगाबाद येथे असून, त्यावर देशातील 13 राज्यांचा कार्यभार आहे.

तसेच, वेळप्रसंगी त्यांच्या टीमला विदेशातील मूर्तिसंवर्धनासाठी जावे लागते. या टीमने 2015-16 मध्ये पांडुरंगाच्या मंदिरावर संवर्धनाचे काम केले आहे. त्यानंतर याच टीमने प्रथम 2020 मध्ये कोरोनाकाळात विठ्ठलमूर्तीवर वज—लेप करण्याचे काम केले. त्यानंतर यंदा मे 2022 मध्ये रुक्मिणीमातेच्या चरणांवर संवर्धन प्रक्रिया करण्याचे काम केले आहे. वज—लेपानिमित्त वारंवार पंढरपुरात जाणारे हे रसायनशास्त्रज्ञही पंढरपुरात गेल्यावर मूर्तीसमोर गेले की भान हरपून जाऊन भावविभोर होतात, अशी कबुलीच त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

रुक्मिणीच्या पायांची खूप झीज झाली होती
विठ्ठल आणि रुक्मिणी या दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या दगडांत तयार केल्या आहेत. विठ्ठलमूर्तीचा दगड खडबडीत तर रुक्मिणीमातेच्या मूर्तीचा दगड मऊ स्वरूपाचा आहे. दोघांच्या पायांची झीज खूपच झाली होती. विठ्ठलमूर्तीचे पूर्ण काम 2020 मध्ये झाले. पण, रखुमाईच्या पायांचे काम राहिले होते. ते यंदा पूर्ण झाले. मातेच्या पावलांची बोटे झिजली होती. ती दिसतच नव्हती. ती पूर्ववत करण्यात आली. आता पावले विलोभनीय दिसत आहेत.

रात्र कशी सरली, ते कळलेच नाही
श्रीकांत मिश्रा म्हणाले, मंदिरातील वातावरण भारावून टाकणारे आहे. आम्ही पांडुरंगाचे दर्शन घेऊन रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यात गेलो. मातेची पावले पूर्ण झिजलेली होती. त्यांचे प्रथम क्लीनिंग केले. नंतर स्टोन पावडर, कलर्स आणि पॉलिमर रेझिन वापरून पावलांना व पुसट झालेल्या बोटांना आकार दिला. रात्रीच्या प्रहारातले पाच तास कसे गेले ते कळलेसुध्दा नाही. काम पूर्ण होताच आम्ही भारावलेल्या अवस्थेतच तिथून बाहेर पडलो.

        – श्रीकांत मिश्रा, उपअधीक्षक, भारतीय पुरातत्व विज्ञान विभाग, औरंगाबाद

Back to top button