अभिनेता होण्याबरोबरच कलाक्षेत्रात आणखीही संधी : अरविंद जगताप | पुढारी

अभिनेता होण्याबरोबरच कलाक्षेत्रात आणखीही संधी : अरविंद जगताप

पुणे पुढारी वृत्तसेवा : आपल्याकडे कुणालाही अभिनेता व्हायचे असते, म्हणून तो मोठ्या शहरात येतो. मात्र अभिनेता होण्यापेक्षाही चित्रपट, मालिका क्षेत्रात इतर मोठ्या संधी आहेत. त्यामध्ये तांत्रिक क्षेत्रातही संधी आहेत, त्यातून खूप सन्मान, पैसा कमावता येतो; पण या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही. कलेला पैशांशी जोडण्याअगोदर आपण किती वाहून घेतले, हे महत्त्वाचे असते. तांत्रिक अंगाने जेवढा या क्षेत्राचा विचार करू तेवढे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन लेखक अरविंद जगताप यांनी केले.

संजय घोडावत प्रस्तुत आणि दै. ‘पुढारी’ आयोजित ’एज्यु-दिशा’ या वेबिनारमध्ये ’कलेमधून पैसे मिळतात का?’ या विषयावर ते बोलत होते. प्रा. दत्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी जगताप म्हणाले, “आपल्याकडे असलेल्या कॅमेरामनकडे सगळी माणसे ही अमराठी असतात. म्हणजे लाईटपासून तांत्रिक विभागातील एडिट करणारी मंडळी.

यामध्ये मराठी मुले कमी दिसतात. कारण काय तर या क्षेत्राला ग्लॅमर नाही, असे त्यांना वाटते. तुम्ही जर तुमचा ठसा उमटवला तर प्रसिद्ध होऊ शकता. कला आणि पैसा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कलावंत असतो म्हणजे काय असतो, संपत्तीपेक्षा या सगळ्या गोष्टीपेक्षा वेगळा आनंद शोधायचा असतो.

आपण कुठल्या तरी कलेची साधना करीत असतो

म्हणून आपण कुठल्या तरी कलेची साधना करीत असतो. माणूस चित्रकार होतो म्हणजे त्याला कुठेतरी आहे त्या भौतिक गोष्टी शोधायच्या असतात. कलाकाराने पैसे कमवावा का? किंवा कमावू नये? हे प्रश्न वेगळे आहेत. मुळात तो अगोदर कलावंत आहे का? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आपल्याकडे खूप गोंधळ निर्माण होतो.

अगोदर आपण पैसा हा मुद्दा गृहीत धरतो.” या सगळ्यात मोठा दोष पालकांचा असतो. आपण मुलांना निखळ कला म्हणून बघूच देत नाही. नोकरीची मानसिकता जोपर्यंत आपण डोक्यातून काढत नाही तोवर कलेतून पैसा मिळू शकतो, हा विचार येणार नाही. कार्टून्सच्या
आवाजात डबिंग करणारादेखील चांगला पैसा कमावतो. आपण पुन्हा पुन्हा नोकरीच्या मानसिकतेत अडकतो.

आपल्याकडे कुठलेही गुण नसताना नोकरी मिळवायची आहे, हे स्वप्न असेल तर आपण कलावंत होऊ शकत नाही. पैसा हा आपोआप येत असतो. पैसा हा सर्वोत्तम गोष्टीच्या मागे धावत येतो. कुठल्याही कलेत सर्वोत्तम दिले पाहिजे, असेही अरविंद जगताप यांनी यावेळी सांगितले.

‘दर्जा सर्वोत्तम द्या, पैसा आपोआप येईल’

सोशल मीडियामुळे तरुणांना जगाशी कनेक्ट राहता येते. सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो टाकून तुम्ही प्रसिद्ध होता, मात्र त्या व्हिडीओ किंवा फोटोचा दर्जा सर्वोत्तम असणे आवश्यक आहे. वाटा खूप मोकळ्या आहेत. फक्‍त झोकून देऊन काम करणारा माणूस हवा आहे. त्यानंतर पैसा तुमच्याकडे आपोआप येईल, असे जगताप यांनी सांगितले.

‘लिखाण प्रक्रिया ही पहिल्यांदा प्रेमात पडण्यासारखी’

आता इंटरनेटमुळे सर्वकाही मिळते. तुम्हाला शोधता आले पाहिजे. त्यामध्ये कचरा खूप आहे, पण त्यातून सोने शोधता आले पाहिजे. कॅमेरा शिकता येतो; पण लिखाण शिकता येत नाही, तो निरीक्षणाचा भाग आहे. कितीही मोठा लेखक असला तरी त्याची पुढील
कलाकृती चांगलीच असेल असे नाही. प्रत्येकच लिखाण उत्तम असेल असे नाही. लेखन हा सरावाचा भाग नाही, कारण प्रत्येक
लेखनात नवीन पात्रं असतात. आपली लिखाणाची प्रक्रिया ही पहिल्यांदा प्रेमात पडतो तसे असते, असे जगताप म्हणाले.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील

Back to top button