

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kisan credit card scheme : मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.
मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे.
या योजतंर्गत तब्बल २२ भाषांमध्ये केंद्रातील तज्ज्ञ माहिती देतात. मागच्या काही महिन्यांमध्ये ३ लाखांवर शेतकर्यांनी शेतीविषयक माहिती घेत आपल्या शंकेचे निरसण केले आहे.
मोदी सरकारने १४ किसान कॉल सेंटरची संख्या वाढवून २१ केली आहे. कोणत्याही भागातील शेतकरी त्यांना फोन करून त्यांच्याच भाषेत माहिती मिळवू शकतात.
किसान कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 आहे. शेतकरी या क्रमांकावर कॉल हा विनाशुल्क आहे.
या २१ केंद्रांमध्ये बसलेले तज्ज्ञ पदवीधर फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, रेशीमपालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय आणि जैवतंत्रज्ञानातील डॉक्टर आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शास्त्रज्ञांनी गेल्यातील वर्षांत १७ लाख ७५ हजारांवर शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
शेतकरी कोणत्याही दिवशी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत किसान कॉल सेंटरच्या क्रमांकावर कॉल करू शकतात. खते आणि कीटकनाशकांच्या वापराच्या प्रमाणाची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळते. फळबाग, पशुवैद्यकीय आणि कृषी उत्पादनांच्या किंमतींबाबत देखील मदत केली जाते.
किसान कॉल सेंटरमधील तज्ज्ञ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, भोजपुरी, छत्तीसगढी, तामिळ आणि मल्याळम यासह २२ भाषांमध्ये माहिती देतात.
शेतकऱ्यांनी केलेला फोन कॉल सेंटरवर उचलला गेला नाही तर नंतर किसान कॉल सेंटर वरून शेतकऱ्याला फोन केला जातो.
किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यावर, एक मजकूर संदेश किंवा व्हॉइस संदेश देखील शेतकऱ्यांना पाठविला जातो.