वारंवार वीज खंडीत केल्‍याने शेतकर्‍यांचा उद्रेक, वीज कर्मचाऱ्यांना डांबले | पुढारी

वारंवार वीज खंडीत केल्‍याने शेतकर्‍यांचा उद्रेक, वीज कर्मचाऱ्यांना डांबले

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील तिसी, भालेर, नगाव, शिंदगव्हाण भागातील एकाच वेळी 20 हून अधिक वीज रोहित्र म्हणजे डीपी बंद ठेवला जात असल्याने संतप्त शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक झाला. या उद्रेकातूनच आज भालेर येथे 5-6 गावातून एकत्र आलेल्या संतप्त जमावाने ग्रामपंचायत कार्यालयात चार वीज कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. या घटनेने एकच खळबळ उडवून दिली. शेतकऱ्यांचा हा उद्रेक लक्षात घेत महावितरण अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्‍याने पुढील अनर्थ टळला.

यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. मुख्य विद्युत वाहिनीवर काहीतरी बिघाड झाल्याचे कारण सांगून ती नादुरुस्त ठेवली जाते. आणि एकाच वेळी अनेक गावातील डीपीवरील वीज खंडीत केली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष वेधण्यासाठी हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

बहुतांश शेतकरी वीज बिल भरण्याला प्रतिसाद देत असताना थकबाकीदारांच्या नावाखाली खोंडामळी भागातच असा त्रास का दिला जातोय? थकित वीज बिल भरायला शेतकरी तयार असताना अधिकाऱ्यांनी आडमुठे धोरण वापरण्याची गरज काय? एकीकडे शेतकऱ्यांचा थकबाकी भरण्याला प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणच जाहीर करते. शेतकऱ्यांमुळे 2100 कोटी रुपयाची वसूली झाल्याचे महावितरण कडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे, मग असे असताना थकबाकी भरण्याच्या मानसिकतेत असलेल्या खोंडामळी भागातील शेतकऱ्यांची अडवणूक कशामुळे केली जात आहे? असे प्रश्न संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित हाेत आहेत.

काही ठिकाणी ग्रामस्थांनीच विद्युत प्रवाहातील बिघाड दुरुस्त करून घेत वीज चालू केली . तरीही ती काल पुन्हा खंडित केल्याचे समजताच शेतकरी आक्रमक झाले. वीज पुरवठ्याबाबत महावितरणकडून व्यवस्थित प्रतिसाद मिळत नसल्याचीही ग्रामस्थांची तक्रार आहे. वीज खंडित असल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची शेतीकामे खोळंबली आहेत. परिणामी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचलं का? 

Back to top button