अभोण्यात अग्नितांडव : पत्र्याच्या 6 गाळ्यांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
अभोणा (जि. नाशिक) वृत्तसेवा –कळवण तालुक्यातील अभोणा येथील किराणा व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते किशोर शहा यांच्या मालकीतील ६ पत्र्याच्या गाळ्यांना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सदर गाळ्यातील व्यावसायिक यांचे झालेल्या अग्नितांडवात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रथम दर्शनी समजते आहे.
सदर दुकानातील व्यावसायिक अनुक्रमे- दूध डेअरीचे संचालक प्रवीणसिंग शिसोदिया यांचे संगणक व डेअरीशी संबंधित अंदाजे ६ लाख रुपयांचे साहित्य आगीत जळून भस्मसात झाले आहे. या सोबत लागून असलेल्या गाळयातील रेडीयम व आर्ट व्यावसायिक प्रदीप साबळे यांचे मशीन व इतर रेडीयम साहित्य अंदाजे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मोटर सायकल रिपेरिंग व स्पेअर पार्ट दुकानाचे संचालक सुनील गायकवाड यांचे दुकान व घरगुती आवश्यक कागदपत्रे तसेच दुकानातील इतर साहित्य यांसह अंदाजे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रिक ऑटो पार्ट दुकानाचे संचालक राहुल साबळे यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेजारी सप्तश्रुंगी स्लायडींग ग्लासचे संचालक गणेश पाटील यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून कुशन वर्कचे संचालक हेमंत अहिरे यांचे फोम शीट व इतर फर्निचर नुकसानात अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते आहे.
सदर अग्नीतांडवाबाबत वृत्त समजताच अभोण्यातील तरुणांनी धाव घेत कळवण नगर पंचायतीचे अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत शर्तीचे प्रयत्न करून काही दुकानांचे साहित्य वाचवले. अग्नीशामक बंब कर्मचारी तसेच कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगारमदत कार्य करणारे अभोण्यातील अग्नीयोद्धा काळीपिवळी चालक नारायण पवार,समाजसेवक अमोल दुसाने, भैया खैरनार , अनिकेत सोनवणे, डॉ. दिपक सैंदाणे,कृष्णकुमार कामळस्कर, गणेश मुसळे, साहिल शहा, भावेश शहा,राहुल कामळस्कर, अमित मुठे , आबा सोनवणे, हर्षल जाधव आणि रामराज्य ग्रुपचे कार्यकर्ते यांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले आहे.
सदर घटनेबाबत शॉर्टसर्किट झाला की कुणी समाजकंटाकाने जाणीवपूर्वक आग लावली असावी असे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. याबाबत अभोणा पोलीस ठाण्याचे सपोनि यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.