सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट, भाविकांचे हाल | पुढारी

सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट, भाविकांचे हाल

तुषार बर्डे : सप्तशृंगीगड

महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपीठ म्हणून असलेल्या सप्तशृंगी गडावरती विविध राज्यातून हजारो भावी भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांसह भाविकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सप्तशृंगीगडावर गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने ग्रामस्थांना गल्ली गल्ली टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. निसर्ग संपन्न आणि प्राचीन काळापासून 108 कुंडाची गाव म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी गडावर केवळ प्रभावी उपाययोजना व ग्रामपंचायतच्या आड मोठेपणाचा नियोजन शून्य कारभार असल्याने भाविकांचे ग्रामस्थांना भर यात्रेत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी वसलेले सप्तशृंगी गाव महाराष्ट्रात धार्मिक स्थळांच्या बाबतीत हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागांमधून पर्यटकांचा राबता गडावरती असतो. असे असले तरी गावात पर्यटकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. विशेष तर पिण्याच्या वापराच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने ती सोडविणे गरजेची आहे. नवरात्रोत्सव चालू होऊन एकच दिवस झाला तरी येणाऱ्या भाविकांना पाणी मिळू शकत नाही यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही. सप्तशृंगी गड परिसर संपूर्ण डोंगराई व वनराईंनी नटलेला परिसर असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो मात्र साठवणुकीसाठी असलेल्या तलावांमध्ये गळती होत असल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावा लागत आहे.  याबाबत ग्रामपंचायतीला  नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या सप्तशृंगी गडावर गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने अक्षरशः विकत पाणी घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडून स्थानिक स्तरावर नियोजन करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पण वास्तविक तसे होताना दिसत नाही.

गावाला पाणीपुरवठा करणा-या पाच किलोमीटर अंतरावरती असलेल्या भवानी पाझर तलावातून मात्र यामध्ये पावसाळ्यात पाणी साचूनही पाणी थांबत नसल्याने व मोठ्या प्रमाणात गळती असल्याने यावरती मोठ्या प्रमाणात निधी खर्च होणे गळतीने थांबल्याने यासाठी ग्रामपंचायत ने कोटी रुपयांच्या निधी खर्च करण्याचा घाट का घातला व त्याचा उपयोगही झाला नाही. त्यामुळे येथील धरणाबाबतही गावातील एकही राजकीय पुढारी बोलल्यास तयार नाही.

108 कुंडांचे पुनर्जीवन व्हावे

सप्तशृंगीगडावर प्राचीन काळापासून 108 कुंड आहेत. या कुंडाचा शोध घेऊन याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र याबाबत देवी संस्थान ग्रामपंचायत किंवा पुरातत्त्व विभागाकडून प्रयत्न होताना दिसत नाही.  येथील पाणीटंचाईसाठी टाळण्यासाठी या कुंडांचे पुनर्जीवन होणे गरजेचे आहे.

जल शुद्धीकरण केंद्राची दयनीय अवस्था

सप्तशृंगी गडावरती 1998 साली कळवण तालुक्यातील पहिले जलसिद्धीकरण केंद्र बांधण्यात आले होते. या केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी झोपडपट्टीचे स्वरूप आले आहे. येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने केंद्राची सुरक्षा देवाच्या भरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी सप्तशृंगी गडावरती भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 75 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली पण तिलाही भ्रष्टाचारचे ग्रहण लागल्याने ती अर्ध्यावरतीच राहिली.  चनकापूर येथे पाण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

…………………………………

भावी भक्तांचा व पर्यटकांचा विचार करून महाराष्ट्र शासन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देतात. पण या ठिकाणी विकास कामे होत नसल्याने निधी पाण्यात गेल्याचे याठिकाणी पाहायला मिळते. तत्कालीन योजनांसाठी माजी ग्रामसेवक यांच्या हट्टपायी टाकण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन डोकेदुखी ठरते.

………………………………….

सप्तशृंगी गडावर आजपासून नवरात्रोत्सव चालू होत आहे. येणा-या भाविक भक्तांना व ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामस्थ पाण्यासाठी भटकत आहे.  आम्हालाही पाणी विकत घ्यावे लागत आहे. दोन दिवसांपासून गल्लीमध्ये टॅंकरने हंडे भरून पाणी ग्रामपंचायत देत आहे. यासारखी दुर्देवी गोष्ट नसल्याने याची खंत वाटत आहे. याबाबत ग्रामपंचायतने नियोजन करणे गरजेचे आहे.

अर्जुन सूर्यवंशी, माजी सरपंच सप्तशृंगी गड

———————–. ———————————-

सप्तशृंगड तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण ऐन नवरात्र उत्सवात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गडावर लाखो भाविक येतात त्यांच्यासाठी व ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पण गेल्या पंधरा दिवसापासून नळाला पाणी नसल्याने अक्षरशः पाणी विकत घ्यावे लागत आहे.

प्रकाश कडवे, जिल्हा चिटणीस भाजपा

हेही वाचा :

Back to top button