भारतीय कांद्याची परदेशात कोंडी, श्रीलंकेची दिवाळखोरी अन् बांगलादेशची आयात बंदी | पुढारी

भारतीय कांद्याची परदेशात कोंडी, श्रीलंकेची दिवाळखोरी अन् बांगलादेशची आयात बंदी

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेल्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तर दुसरीकडे बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. श्रीलंकाही आर्थिक अराजकतेत अडकल्याने अनेक भारतीय व्यापार्‍यांचे पैसे अडकले आहेत. यामुळे या दोन देशांत कांद्याची कोंडी होत आहे.

देशातून निर्यात होणार्‍या एकूण निर्यातीत जवळपास 25 टक्के वाटा हा बांगलादेश आणि श्रीलंकेचा आहे. बांगलादेशपाठोपाठ श्रीलंका कांदा निर्यात ठप्प झाल्याने भारतीय कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. याचाच फटका कांदा भावावर पडला असल्याचे कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले. बांगलादेश सरकारने कांद्याची आयात बंदी केल्याने भारतीय कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. दरामुळे शेतकरी वर्गाबरोबर निर्यातदार व्यापारी कोंडीत सापडल्याची स्थिती आहे. देशात कांदा निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण नसल्याने फटका बसत आहे. स्पर्धक म्हणून इतर देशांकडून परकीय बाजारपेठ काबीज केली जात आहे. ही बाब देशातील कांदा पिकासाठी आव्हानात्मक बनत आहे. भारतीय कांदा निर्यातदारांसाठी बांगलादेश ही प्रमुख बाजारपेठ आहे. या देशाने असा निर्णय घेतल्याने याचा थेट फटका कांदादराला बसत आहे.

पाकचा कांदा निघण्यास सुरुवात
पाकिस्तानचा नवीन कांदा बाजारपेठेत निघण्यास सुरुवात झाला असून, त्याचा दर आपल्या कांदादरापेक्षा प्रतिकिलो दोन ते तीन रुपये महाग असल्याने भारतीय कांद्याला मागणी समाधानकारक राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीला चालना दिल्यास काही प्रमाणात का होईना निर्यातीत वाढ होऊन शेतकर्‍यांना दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

किसान रेलही झाली बंद
नाशिक जिल्ह्यातून कांदा आणि इतर शेतमालाचा निकस होण्यासाठी सुरू असलेली किसान रेल्वे अचानक बंद केल्यामुळे कांदा निकस होण्यात अडथळा येत आहे. शेतकर्‍यांच्या मालास व्यापक बाजारपेठ मिळून, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने किसान एक्स्प्रेस सुरू केली होती. यामुळे शेतकर्‍यांचा नाशवंत माल कमी दरात थेट जात असल्याने चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, अचानक किसान रेल्वे बंद झाल्याने शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे.

बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक होत असून, त्यास सरासरी 900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. इंधनाचे दर नवनवीन विक्रम करत आहे, तर गॅस सिलिंडरचे भाव एक हजाराच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे शेतमालाचे दर मात्र दररोज कोसळत असल्याने बळीराजा अडचणीत आहे.
– संजय गवळी, शेतकरी, खडक माळेगाव

प्रतिकूल परिस्थितीत शेतकर्‍यांना सरकारने मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या धोरणांचा शेतकर्‍यांना फटकाच बसत आहे. शेतकर्‍यांना उभे करण्यासाठी सरकारने अनुदानरूपी मदत करावी.
– विकास सिंग, व्यापारी, नाशिक

हेही वाचा :

Back to top button