

मुंबई: पुढारी ऑनलाईन: पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा घेणार नसल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. प्रवेश परीक्षा घेतल्यानंतरच काही अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जात होता.
मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला आहे.
त्यामुळे एवढ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? निकष काय असतील अशी चर्चा सुरू झाली.
पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अशी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत उदय सामंत म्हणाले, 'कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही सीईटी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत.
एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठाने घ्यायला हवी, अशा सूचना दिल्या आहेत.'
सामंत यांनी सांगितले, काही प्रोफेशनल कोर्ससाठी २६ ऑगस्टपासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल,' मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती, त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल.
इंजिनीअरिंग प्रवेशासाठी दोन सत्रात सीईटी परीक्षा असेल. पहिले सत्र १४ सप्टेंबरपासून, तर दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.
एमबीए, एमसीएम, आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,बी एड् अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी, अकरावीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला.
त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे. राज्यातील १३ लाख, १४ हजार, ९६५ विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी पात्र असून त्यांच्या प्रवेशाचे शिवधनुष्य सरकारला पेलावे लागणार आहे.
यंदा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ६३ हजार ६३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्या (९१ हजार ४२०)अधिक आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ८४ हजारांनी ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणा आहे.
पहा व्हिडिओ: नो किसींग झोन
https://youtu.be/himRwgmAiXI