राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका; हायकोर्टाने सुनावले
मुंबई : विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. या जनहित याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करणार्या गोपीकिशन बजोरिया यांचा उच्च न्यायालयाने समाचार घेतला.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने या याचिकेशी आपला संबंध काय, नेमका तुमचा हेतू काय, कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार आमदार म्हणून स्वतःची शिफारस करण्याची अपेक्षा व्यक्त करता, असे प्रश्न करत राजकीय लढाईसाठी न्यायालयाचा वापर करू नका, असे खडे बोल सुनावले. याचिकेची सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर निश्चित केली.
या नियुक्त्या करण्यात राज्य सरकार चालढकलपणा करत आहे, असा आरोप करून शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हस्तक्षेप करणारी याचिका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे .