Politics : राजकीय सुडापोटी अनिल देशमुखांना अटक : नवाब मलिक
मुंबई; पुढारी ऑनलाईन : समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांचं प्रकरण दिवसेंदिवस राजकीय वर्तुळात नवे वळण घेत आहे. त्यावरून राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि भाजप आरोप-प्रत्यारोपांच्या (Politics) मैदानात उतरली आहे. आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या टिकेला उत्तर देत नवाब मलिक म्हणाले की, “मी कोणत्याही महिलेवर आरोप केला नाही. दोन्ही महिलांचा उल्लेख यासाठी आला की, त्यांचा या प्रकरणात समावेश आहे. किरीट सोमय्या यांनी अजित पाटील, संजय राऊत, एकनाथ खडसे, यांच्या घरातील महिलांवरदेखील आरोप केला. त्यांच्या घरातील महिला आहेत आणि इतरांच्या घरातील महिला नाहीत का?”, असा प्रश्न सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
नवाब मलिक पत्रकार परिषदेत बोलत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस तुमचे नियटवर्तीय समीर वानखेडे आहेत, त्यांच्याकरवी माझा तपास करा. माझ्या जावयाच्या घरातून कोणतंही ड्रग्ज जप्त करण्यात आला नाही. हवंतर त्याचा पंचनामादेखील देतो. मी कोणतेही हवेत आरोप करत नाही”, असं प्रत्युत्तर मलिकांना फडणवीसांनी दिलं आहे.
“माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे कुणीच सिद्ध करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना मला अटक का केली नाही? त्यामुळे बाॅम्ब फोडण्यासाठी दिवाळीची वाट पाहू नका. पंचतारांकीत हाॅटेलमध्ये आयोजित पार्टी तुम्हाला दिसल्या नाहीत का? एका टेबलची किंमत १५ लाख रुपये होते. सॅम डिसुझा, फ्लेचर पटेल, मनीष भानुशाली, के. पी. गोसावी यांना घेऊन समीर वानखेडे मुंबईत येताच ‘प्रायव्हेट आर्मी’ उभी केली. या आर्मीन कोट्यवधींची वसुली केली. वानखेडे यांनी मालदिवमध्ये वसुली केली.”
“समीर वानखेडे हे ७० हजारांचा शर्ट वापरतात. लाखो रुपयांचं घड्याळ घालतात. १ लाखाची पॅन्ट वापरतात. २ लाखांचे बुट वापरतात, इतके प्रामाणिक अधिकारी आहेत. जेएनपीटी बंरदावर १५ दिवसांपासून ५१ टन पडून आहे, पण कारवाई नाही. अनिल देशमुखांदेखील फसविण्यात आलं आहे. राजकीय सुडापोटी त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई नेत्यांना घाबरविण्यासाठी केल्या जात आहेत. परबवीर सिंगांना कुठं आहेत. जाणीवपूर्वक त्यांना देशातून बाहेर पडण्यास मदत करण्यात आली. याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल”, अशीही माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांचे कनेक्शन असल्याचा आरोप करत मलिक यांनी कारागृहात असलेल्या जयदीप राणांचा फोटो ट्विट केला होता. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर असून त्याच्यासोबत एका फोटोत फडणवीस दिसत होते. माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आशिर्वादानं ड्रग्ज कारभार सुरु होता. याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देत मलिकांवर हल्लाबोल केला.
माझा आणि माझ्या पत्नीचा त्या व्यक्तीशी संबंध नाही. मलिकांनी केलेले आरोप लवंगी फटका आहेत. दिवाळी झाल्यानंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात सापडला. या अनुषगांने मलिकांची पार्टी ड्रग्ज माफिया म्हणावी लागले, असा पलटवार त्यांनी केला. सुरुवात मलिकांनी केली, शेवट मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही, असे टोलाही फडणवीस यांनी लगावला होता.