मध्य रेल्वेच्या 'वंदे भारत'ला प्रवाशांची पसंती
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेवर सध्या धावत असलेल्या सीएसएमटी- शिर्डी, सोलापूर आणि नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांनी पसंती दिली आहे. १० फेब्रुवारी ते २५ मे दरम्यान शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने तब्बल तीन लाख १६ हजार तर डिसेंबरपासून सुरू झालेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसने पावणे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मे महिन्यात सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने मेक इन इंडिया अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वसानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी-साईनगर शिर्डी, सोलापूर व नागपूर-बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. या तिन्ही गाड्यांना उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
मे महिन्यात वंदेभारत सुसाट एक्स्प्रेस तारीख व प्रवासी संख्या
- सीएसएमटी-साईनगर शिर्डी २० मे १००.९७ टक्के
- साईनगर शिर्डी-सीएसएमटी २१ मे १०३.६३ टक्के
- सीएसएमटी-सोलापूर १२ मे ११९.४५ टक्के
- सोलापूर-सीएसएमटी २ मे १५१. २४ टक्के
- नागपूर-बिलासपूर १९ मे १३३.३९ टक्के
- बिलासपूर-नागपूर २३ मे १३७.५४ टक्के
सुरुवातीपासूनची प्रवासीसंख्या
- सीएसएमटी-साईनगर शिर्डी : १ लाख ६२ हजार ३२४
- सीएसएमटी-सोलापूर : १ लाख ५४ हजार ६४७
- नागपूर-बिलासपूर: १ लाख ७४ जार ४५०