मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आता राज्यगीत … शासकीय कार्यक्रमांत गीत वाजणार | पुढारी

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आता राज्यगीत ... शासकीय कार्यक्रमांत गीत वाजणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राजा बढेंनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे
यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत आता महाराष्ट्राचे राज्यगीत होणार आहे. लवकरच तशी घोषणा केली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना आपापले राज्यगीत ठरविण्याच्या सूचना केल्या आहेत. काही राज्यांनी आपले राज्यगीत
तयार केले आहे. राज्यगीत सुचविण्यासाठी समितीही तयार करण्यात आली होती. त्यानुसार आता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात येईल. राजशिष्टाचारानुसार सर्व शासकीय कार्यक्रमात हे गीत वाजविण्यात येईल. कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यगीताने, तर समारोप  राष्ट्रगीताने होणार आहे. या गीताचे हक्क ज्यांच्याकडे आहेत, त्यांची परवानगी घेण्याचे सर्व सोपस्कार पार पाडूनच हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

19 ऑक्टोबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण तसेच इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. अन्यथा याच कार्यक्रमात याची घोषणा केली असती, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Back to top button