शिंदे- फडणवीस सरकार : महत्त्वाच्या खात्यांसाठी रस्सीखेच; भाजपमध्ये मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी | पुढारी

शिंदे- फडणवीस सरकार : महत्त्वाच्या खात्यांसाठी रस्सीखेच; भाजपमध्ये मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी

मुंबई : दिलीप सपाटे :  राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले असून, आता सर्वांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. शिंदे यांच्या गटाने सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, परिवहन, उत्पादन शुल्क, ऊर्जा, कामगार, कृषी, सहकार, उच्च आणि तंत्रशिक्षण यासारख्या महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला आहे. तर भाजपमध्येही मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमधील बहुतांश मंत्री या मंत्रिमंडळातही पुनरागमन करतील, अशी शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभेचे रविवारपासून दोन दिवसांचे अधिवेशन होणार आहे. यात अध्यक्ष निवड आणि सरकारवरील विश्‍वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शनिवार आणि रविवारी अधिवेशन होणार होते; मात्र ते एक दिवस पुढे ढकलण्यात आले.

गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे गटात 50 आमदार सामील झाले असून, त्यात 9 मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदे मिळणार आहेत; पण शिंदे गटातील अनेक आमदारांचीही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. तसेच या गटातील काही मंत्र्यांना आधीपेक्षा चांगली खातीही हवी आहेत. त्यामुळे शिंदे गटाने अनेक महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे आधी नगरविकास खात्यासह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते होते. त्यांना ग्रामीण भागाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे असलेले सार्वजनिक बांधकाम खातेही हवे आहे. उदय सामंत हेदेखील बंडात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्‍का बसला होता. त्यांना आता त्यांच्याकडील आधीचे उच्च व तंत्रशिक्षण हे खाते कायम ठेवून उद्योग खातेही हवे आहे. गुलाबराव पाटील यांनाही आधीच्या पाणीपुरवठा खात्यापेक्षा चांगले खाते हवे आहे.

दादा भुसे यांना आधीचे कृषी खातेही चालणार आहे. तर राज्यमंत्री असलेले बच्चू कडू, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई हेदेखील कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तसेच आशिष जयस्वाल,तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, संजय शिरसाट, भरत गोगावले, सदा सरवणकर आदी आमदारही मंत्रिपदासाठी आग्रही आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, ऊर्जा, कृषी, परिवहन, उद्योग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार आदी महत्त्वाच्या खात्यांची मागणी भाजपकडे केली आहे. मात्र, भाजपचाही सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, नगरविकास आणि उद्योग खात्यासाठी आग्रह आहे.

मंत्रिपदासाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी

मंत्रिपदासाठी भाजपमध्येही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सध्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, संजय कुटे, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे-पाटील, सुरेश खाडे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल, मोनिका राजळे, प्रशांत ठाकूर यांची वर्णी पक्‍की मानली जात आहे. त्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील असलेल्या अनेक चेहर्‍यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

फडणवीस यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी तसेच आमदार किसन कथोर, गणेश नाईक, महेश लांडगे, मदन येरावार यांच्या नावांचीही चर्चा आहे. अनेक इच्छुकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी गर्दी दिसत आहे. अपक्ष आमदार रवी राणा हेदेखील मंत्रिपद मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत.

अधिवेशन संपताच प्रदेश भाजप मंत्र्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय टीमकडे करणार आहे. येत्या आठवडाभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. गुलाबराव पाटील यांनाही आधीच्या पाणीपुरवठा खात्यापेक्षा चांगले खाते हवे आहे. दादा भुसे यांना आधीचे कृषी खातेही चालणार आहे.

तर राज्यमंत्री असलेले बच्चू कडू, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई हेदेखील कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तसेच आशिष जयस्वाल, तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, संजय शिरसाट, भरत गोगावले, सदा सरवणकर आदी आमदारही मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, ऊर्जा, कृषी, परिवहन, उद्योग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार आदी महत्त्वाच्या खात्यांची मागणी भाजपकडे केली आहे. मात्र, भाजपचाही सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, नगरविकास आणि उद्योग खात्यासाठी आग्रह आहे.

Back to top button