आंतरराष्ट्रीय पर्वतदिन विशेष : पर्वतांचे संरक्षण आपली जबाबदारी...
कोल्हापूर : सागर यादव
वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार, पर्यावरणीय विविधतेने परिपूर्ण आणि भविष्याच्या द़ृष्टीने काळाची गरज असणार्या पर्वतांच्या जतन-संवर्धन-संरक्षणाची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्याला सह्याद्री पर्वत रांगेतील उंच पर्वतांबरोबरच इतर लहान-लहान डोंगर-टेकड्यांच्या साखळीने परिपूर्ण बनवले आहे.
पर्यावरणातील पर्वतांचे महत्त्व, त्यांची भूमिका आणि आपल्या जीवनातील त्यांचा प्रभाव यासंदर्भात लोकप्रबोधनाच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पर्वतदिन संकल्पना मांडण्यात आली. 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्वत दिन संकल्पना मांडण्यात आली. पर्वतांना असणारे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र महासभेने 2002 ला ‘आंतरराष्ट्रीय पर्वत वर्षाची’ घोषणा केली.
त्यानुसार 2003 पासून 11 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून साजरा होऊ लागला. दरवर्षी हा दिवस नव्या संकल्पनेने साजरा केला जातो. यंदा (2021) या पर्वत वर्षांची संकल्पना ‘शाश्वत पर्वतीय पर्यटन’ अशी आहे.
गतवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाची (2020) थीम ‘पर्वतीय जैवविविधता’ ही होती. पर्वतांवर आढळणारी समृद्ध जैवविविधता साजरी करण्यासाठी आणि त्यांना भेडसावणार्या धोक्यांना तोंड देण्यासाठी ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी ठरवली होती.
हवामान बदल, कृषी पद्धती, व्यावसायिक खाणकाम, वृक्षतोड आणि शिकार यासारख्या अनेक दुर्दैवी गोष्टींनी पर्वताच्या जैवविविधतेवर परिणाम केला आहे. याबाबतची जाणीव लोकांमध्ये करून देत या गोष्टी थांबविण्यासाठी तात्काळ कृतिशील उपाय-योजना करणे हा उद्देश
होता.
शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य सह्याद्री भक्कम पर्वत रांगांनीच केले; मात्र कालौघात या पर्वतरांगांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आली आहे.
– डॉ. मधुकर बाचुळकर,
पर्यावरण तज्ज्ञ
पश्चिम घाट ‘अर्थ’कारणाचा कणा
पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री पर्वत रांगेने नटलेला परिसर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. लहान-मोठ्या डोंगर-टेकड्या-दर्यांमधील जैव व पर्यावरणीय विविधता, विविध खनिजे, अनेक नद्यांची उगम स्थाने यामुळे हा जिल्हा परिपूर्ण बनला आहे.
विविध धरणांमुळे वीज, शेती व लोकांना वापरासाठी वर्षभर मुबलक पाणीपुरवठा होतो. यावर विविध उद्योगधंदे विकसित झाले आहेत. यामुळे पश्चिम घाट ‘अर्थ’कारणाचा कणा बनला आहे.
पर्वतांचा मोठ्या प्रमाणात र्हास
कालौघात डोंगर-दर्यातील पर्यावरणीय साधन-सामग्रीचा प्रचंड वापर, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, खनिजे इको फ्रेंडली पद्धतीने न काढणे, अशास्त्रीय पद्धतीने डोंगर पेटविणे अशा विविध कारणांमुळे पर्वतांचा मोठ्या प्रमाणात र्हास होऊ लागला आहे. ही संपदा जपली नाही, तर पुढच्या पिढ्यांना हा ठेवा शिल्लक राहणार नाही, याचे भान राखणे काळाची गरज आहे.