कोल्हापूर : जोडण्या सुरू; ५० दिवस उडणार धुरळा! | पुढारी

कोल्हापूर : जोडण्या सुरू; ५० दिवस उडणार धुरळा!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला. संभाव्य उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या जोडण्या सुरू झाल्या. या निवडणुकीसाठी तब्बल 50 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. या कालावधीत वातावरण निर्माण करणे आणि ते अखेरच्या दिवसांपर्यंत टिकवण्याचेही आव्हान राजकीय पक्षांसह उमेदवार आणि कार्यकर्त्यांवरही राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी जाहीर प्रचाराची 5 मे रोजी सायंकाळी पाच वाजता सांगता होणार आहे. या कालावधीचा विचार केला तर प्रचारासाठी तब्बल 50 दिवस मिळणार आहे. 2019 च्या निवडणुकीत प्रचारासाठी 42 दिवसांचा तर 2014 च्या निवडणुकीत प्रचारासाठी 43 दिवसांचा कालावधी मिळाला होता.

उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडावी याकरिता कार्यकर्त्यांना 50 दिवस राबावे लागणार आहे. प्रचाराचा कालावधी निश्चित झाल्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी नियोजनास सुरुवात केली आहे. 50 दिवसांत कुठे मेळावे घ्यायचे, किती पदयात्रा काढायच्या, किती कोपरा सभा घ्यायच्या, किती मोठ्या सभा घ्यायच्या यासह प्रचाराचे अन्य कोणते फंडे वापरायचे, त्यानुसार कोणते उपक्रम घ्यायचे, कोणावर कोणती जबाबदारी द्यायची आदींसह दैनंदिन खर्च, प्रचार साहित्यांचा खर्च आदींचा मेळ घालत प्रचाराची आखणी सुरू झाली आहे.

प्रचारासाठी मिळणारा 50 दिवसांचा कालावधी तसा मोठा आहे. या कालावधीत सर्वच राजकीय पक्षांपुढे उमेदवाराचे वातावरण तयार करणे आणि ते मतदानाच्या दिवसांपर्यंत कायम ठेवणे हे मोठे आव्हानच असणार आहे. त्यादृष्टीने प्रचार यंत्रणा राबविण्याबाबतही विचारविनिमय सुरू झाला
आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ

निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू केला आहे. संभाव्य उमेदवारांच्या फोटोसह आतापासूनच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

Back to top button