नाते जोडणारी ‘अंगठी’ विजयी करा : आ. सतेज पाटील | पुढारी

नाते जोडणारी ‘अंगठी’ विजयी करा : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : सभासद हा कारखान्याचा आत्मा आहे. मात्र, गेल्या 28 वर्षांतील राजाराम कारखान्यातील कारभार पाहिल्यानंतर कारखाना आणि सभासद यांच्यातील नाते तुटले आहे. त्यामुळे सभासदांशी हे नाते पुन्हा द़ृढ करण्यासाठी, तसेच कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी ‘अंगठी’ला विजयी करावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. छ. राजाराम कारखाना निवडणूक प्रचारार्थ परिवर्तन आघाडीच्या वतीने पट्टणकोडोली येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

आ. सतेज पाटील म्हणाले, कार्यक्षेत्रातील गावांमधील शेतकर्‍यांचे अर्थकारण कारखान्यावर अवलंबून आहे. उसाचा दर, ऊसतोड हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत; पण सत्तारूढ गटाच्या कारभारामुळे सभासद कारखान्याकडे यायचे टाळत आहेत. कारखान्याची सद्यस्थिती पाहून हे सभासद व्यथित झाले आहेत. त्यामुळे सभासदांसाठी जिव्हाळ्याचा असणारा राजाराम कारखान्याचा लौकिक वाढविण्यासाठी परिवर्तन घडवा.

ज्येष्ठ सभासद महादेव मोटे महाराज यांनी राजाराम कारखान्यात लोकशाही टिकवण्यासाठी परिवर्तन आघाडीला मतदान करा, असे आवाहन केले.

यावेळी ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, उपसरपंच उमेश गुरव, अमोल बानदार, शरद पुजारी, सुधाकर पोवार, शिरीष देसाई, रमेश देसाई, धुळा पुजारी, बाळू बच्चाई, विजय पिराई, सचिन पाटील, बबन रानगे, राजू यादव, प्रकाश जेरे, नाना मोटे, विनायक फाळके यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button