शेतकरी एकता टिकविण्यासाठी प्रयत्न करा : आ. जिग्नेश मेवानी
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी विरोधी सरकार सत्तेत बसले असल्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात सर्व शेतकर्यांनी एकत्र आले पाहिजे. तसेच शेतीचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच एकता टिकविण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन गुजरातचे आ. जिग्नेश मेवानी यांनी केले.
तपोवन मैदानावर सतेज कृषी व पशू प्रदर्शन 2022 चे उद्घाटन मेवानी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. हसन मुश्रीफ होते. दि. 26 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन आहे. कार्पोरेट व भांडवलदारांच्या हातात सत्ता म्हणजेच क्रांती असे मानणारे सत्ताधारी आहेत. असे सांगून आ. जिग्नेश मेवानी म्हणाले, लोकशाही व संविधान न मानणारे लोक सत्तेवर असून ते संविधान व लोकशाहीला संपविण्याचा प्रयत्न करत आहेत.अल्पसंख्याक समाजातील आ. हसन मुश्रीफ गेली अनेक वर्षे निवडून येत आहेत. यावरून कोल्हापूरची पुरोगामी जनता फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. यावेळी मुश्रीफ यांचे भाषण झाले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आ. जयश्री जाधव, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी आ. के. पी. पाटील, बजरंग देसाई, सुरेश साळोखे, संजय घाटगे, राजीव आवळे, व्ही. बी. पाटील, अॅड. गुलाबराव घोरपडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, तेजस पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
मातीविना पाण्यावर येणारा भाजीपाला रेशीम गाव, बसरगे (चंदगड) मधाचे गाव, पाटगाव (भुदरगड) गोड्या पाण्यातील मोत्याची शेती ड्रोनद्वारे कीडनाशक फवारणी रेशीम शेती फिरती प्रयोगशाळा 200 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग तांदूळ महोत्सव.