रत्नागिरीत ९ गावठी बाॅम्ब घेऊन येणाऱ्या दोघांना अटक
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे 9 जीवंत गावठी बाॅम्ब घेउन रत्नागिरीत येणार्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई (शनिवार) सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आली. रामा सुरेश पालयेकर (वय 22,रा. वरचा वडखोल,वेंगुर्ला) आणि श्रीकृष्ण केशव हदळणकर (24,रा.गावडेश्वर मंदिर वेंगुर्ला) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिस हेड कॉस्टेबल उदय चांदणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, शनिवारी सायंकाळी दोन तरुण गावठी हातबाॅम्ब घेउन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानूसार, पथकाने हातखंबा तिठा येथे सापळा रचला होता. शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास या पथकाला पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणार्या दुचाकी (एमएच-07-एपी-2700) वरील दोघांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्यांची दुचाकी थांबवली. त्यांची कसून चौकशी तसेच तपासणी केल्यावर त्यांच्याजवळ 9 जीवंत गावठी बाॅम्ब या पथकाला मिळून आले.
दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांनाही ताब्यात घेउन पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रामीण पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करुन आज (रविवार) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हे दोघे जीवंत गावठी बाॅम्ब रत्नागिरीत कशासाठी घेउन येत होते याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.