बेळगाव : जिल्‍हा रूग्‍णालयात ३ बालकांचा मृत्‍यू; आरोग्‍य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कुटुंबियांचा आरोप | पुढारी

बेळगाव : जिल्‍हा रूग्‍णालयात ३ बालकांचा मृत्‍यू; आरोग्‍य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कुटुंबियांचा आरोप

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा

रुबेलाचे इंजेक्शन दिल्यानंतर तिघा बाळांचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावात घडली. याची आरोग्यविभागाने गांभीर्याने दखल घेतली असून, तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्यां मध्ये पवित्र हुलगुर (13 महिने), मधु उमेश कुरगुंडी (14 महिने) आणि चेतन पुजारी (15 महिने) या बालकांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी चौघा बाळांना बिम्स (बेळगाव जिल्हा रुग्णालय) मध्ये दाखल करण्यात आले होते. या तिघांचा मृत्यू झाला आहे. रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून एकूण 17 बालकांना रुबेला लस देण्यात आली होती. त्यानंतर चार मुले आजारी पडली होती आणि नंतर तिघांचा मृत्यू झाला. अन्य एका मुलाची प्रकृती गंभीर असून, त्‍या मुलाची मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे समजते.

बेळगाव जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. तीन लहान मुलांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. काल शनिवारी ( 15 जानेवारी ) एका बालकाचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. बिम्स हॉस्पिटलमध्ये सध्या शवविच्छेदन सुरू आहे. या मुलांना रुबेला लस देण्यात आली होती. 12 जुलै रोजी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुबेला लस दिली. इंजेक्शन दिल्यानंतर उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. यानंतर ताबडतोब मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, चौकशी नंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही मुन्याळ मुंडे यांनी दिली.

Back to top button