श्रीरामपूर : बाजार समितीत 11 उमेदवारांनी घेतली माघार, 20 तारखेला अंतिम चित्र स्पष्ट होणार; कोण करणार, कोणाशी युती? | पुढारी

श्रीरामपूर : बाजार समितीत 11 उमेदवारांनी घेतली माघार, 20 तारखेला अंतिम चित्र स्पष्ट होणार; कोण करणार, कोणाशी युती?

श्रीरामपूर (नगर), पुढारी वृत्तसेवा: श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून आज सोसायटी, ग्रामपंचायत आणि व्यापारी अशा तिन्ही मतदार संघातून 230 पैकी अवघ्या 11 जणांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. अर्ज माघारीची अंतिम मुदत 20 एप्रिल असून निवडणुकीचे खरे चित्र यानंतरच स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीसाठी एकूण 230 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, आमदार लहू कानडे, शिवसेनेचे अशोक थोरे व सचिन बडदे याशिवाय शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे व जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे अशा सर्वांनी स्वतंत्ररित्या आपापल्या कार्यकर्त्यांचे अर्ज भरून ठेवले आहेत.

आज अर्ज माघार घेणार्‍यांमध्ये सोसायटी मतदार संघातून प्रकाश थोरात, विजय सदाफळ, मंजुषा ढोकचौळे, विठ्ठल राऊत, अनिता कालंगडे तर ग्रामपंचायत मतदार संघातून अतुल खरात, ताजखा पठाण, मंजुषा ढोकचौळे आणि व्यापारी मतदार संघातून रियाज हबीब खान, इलाही बक्ष शेख, शब्बीर खाटीक यांनी आपापले उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भाग पूर्ण पिंजून काढला आहे. मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांनी मतदारांना मोठी साद घातली आहे.या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील, भानुदास मुरकुटे, करण ससाने, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे.

दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी कोणी युती केल्यास कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. या इशार्‍यामुळे काही राजकीय गणिते बदलतात का? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Back to top button