निळवंडे कालव्याच्या काम कोणी बंद पाडले हे सर्वांना माहित : बाळासाहेब थोरात | पुढारी

निळवंडे कालव्याच्या काम कोणी बंद पाडले हे सर्वांना माहित : बाळासाहेब थोरात

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : अनेक अडचणीवर मात करत आपण निळवंडे धरण पूर्ण केले. बोगद्यांची कामे सुद्धा मार्गी लावली नंतर राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांची कामे जोरात सुरू झाली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही कामे रखडली गेली. सध्या काम बंद आहे हे बंद काम कोणी बंद पाडले हे आपणा सर्वांना माहित आहे. निळवंडे कालव्यांची कामे बंद करून दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालवण्याचे काम काही जण करत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधा कृष्णविखे यांचे नाव न घेता केली.

बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे ,ॲड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीत देशमुख ,डॉ. जयश्रीताई थोरात ,राज्य सहकारी आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, आपण आपल्या मंत्रिपदाच्या काळात निळवंडेचे काम प्रगतीपथावर नेले होते. मात्र सन २०१४ ते ते १९ भाजप सरकारच्या काळात कालव्यांची कामे थंडावली होती. परंतु सुदैवाने सन २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि पुन्हा कालव्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून आणला. रात्रंदिवस काम सुरू होते. दिवाळीतच संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडेचे पाणी पोचविण्याचे आपले प्रयत्न होते. परंतु जूनमध्ये सत्तांतर झाले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच निळवंडे कालव्यांची कामे पुन्हा थांबली. मात्र त्यातून सरकारने मार्ग काढून ही थांबलेली निळवंडे कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजेत. तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागातील शेत कऱ्यांच्या शेतात पाणी गेले पाहिजे, यासाठी आपला कायम आग्रह राहणार असल्याचे त्यांनी सांगितले

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेर तालुका सहकार पंढरीचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जात आहे. येथील प्रत्येक संस्थेने आपला वेगळा लौकिक निर्माण केला आहे. ही परंपरा सर्व नवीन पदाधिकाऱ्यांनी जोमाने पुढे नेऊन संस्थांचा नावलौकिक करून ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रतापराव ओहोळ यांनी केले. उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button