करंजी : शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली थांबवा : आमदार तनपुरे | पुढारी

करंजी : शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली थांबवा : आमदार तनपुरे

करंजी : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी वीजबिलासाठी त्यांची अडवणूक केली जात आहे. या जुलमी वसुलीच्या निषेधार्थ मिरी सबस्टेशनवर बुधवार दि.7 डिसेंबर रोजी शेतकर्‍यांसोबत मोर्चा काढून त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी 39 गावातील शेतकर्‍यांच्या शेती पंपाच्या वीजप्रश्ना संदर्भात समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी राज्य सरकार व महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री म्हणतात शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केला जाणार नाही.

महावितरणचे अधिकारी थकबाकीचे कारण पुढे करत शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करू लागले आहेत. पाच हजार रुपये शेतकर्‍यांनी भरावेत यासाठी शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे. मुळात रब्बी आणि खरीप दोन्ही पिक अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना सरकार मात्र महावितरणच्या आडून वसुली करत आहे अशा शब्दात उपस्थित अनेक शेतकर्‍यांनी आपल्या भावना आमदार तनपुरे समोर व्यक्त केल्या.

आमदार तनपुरे म्हणाले, मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ऊर्जा विभागाने अनेक कृषी धोरण आणली. 50 ते 60 टक्के मागची वीज बिल माफ केली तसेच विजबिलपोटी वसुली झाल्यानंतर त्याच गावात 33 टक्के रक्कम खर्च करून ओव्हरलोडचे ट्रांसफार्मर बदलण्यासह इतर अनेक कामे केली.

भाजपमुळेच आम्हाला त्यावेळी वसुली करावी लागली

भाजपच्या काही लोकांनी बँकांना पत्र पाठवून महावितरण संदर्भात तगादे लावण्याचे काम केले म्हणून आम्हाला काही प्रमाणात वसुली करावी लागली. मात्र, शेतकर्‍यांना विजेचे अनेक फायदे मिळवून दिले.

शिंदे-फडणवीस सरकारला व्हिजन नाही

आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकार कडे शेतकर्‍यांसाठी कोणतेही व्हिजन नाही. कोणतेही कृषी धोरण नाही सरकारमध्येच अवमेळ असल्याचे दिसून येत आहे. ते शेतकर्‍यांना काय न्याय देणार, असा सवाल उपस्थित केला.
यावेळी माजी पं. स सदस्य राहुल गवळी, सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, युवानेते अमोल वाघ, जालिंदर वामन, अंबादास डमाळे, सरपंच सुधाकर वांढेकर, पिनू मुळे, राजेंद्र पाठक, अजय पाठक, रमेश गिते, सचिन होंडे, बद्रीनाथ सोलाट, सुनील पुंड, सुनील लवांडे, शिवसेना नेते राजेंद्र म्हस्के, प्रतीक घोरपडे, आबासाहेब अकोलकर, अमोल वाघ, हनुमंत घोरपडे, बंटी अकोलकर, रमेश शिंदे, राजेंद्र अकोलकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. तनपुरेंनी अधिकार्‍यांना खडसावले

वीजप्रश्नासंदर्भात शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार तनपुरे यांनी तीसगाव जनसंपर्क कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला काही महावितरणचे अधिकारी उशिरा पोहोचल्यानंतर तनपुरे यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.

Back to top button