नगर : शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय करा, आ.संग्राम जगताप यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली मागणी | पुढारी

नगर : शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय करा, आ.संग्राम जगताप यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली मागणी

नगर, पुढारी वृत्तसेवा: अहमदनगर शहर व संपूर्ण नगर ग्रामीण तालुक्यासाठी सद्यस्थितीला एकच तहसीलदार कार्यालय कार्यरत आहे. शहर व तालुक्याची वाढती लोकसंख्या व कामाचा व्याप लक्षात घेता एका तहसील कार्यालयावर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे अहमदनगर शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करण्यात यावे, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एकत्रित तहसील कार्यालयामुळे नगर ग्रामीण व शहरातील अनेक लोकांची कामे वेळेवर होत नसून, त्यामुळे सदर तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सदर कार्यालयात नागरिकांचे सातबारा, नोंदी, पीक पाहणी, विविध प्रकारचे दाखले, स्वस्त धान्य नागरिकांना वेळेवर मिळत नाही, तसेच इतर पुरवठा विषयक कामे संजय गांधी योजनेअंतर्गत लोकांना दिली जाणारी पेन्शनविषयक सेवा, यामध्ये फार दिवस नागरिकांची कामे रखडली जातात.

तहसीलदार यांच्याकडे अनेक दिवसांपासून महसूली दावे व हरकती प्रलंबित आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय व वेळेचा अपव्यय लक्षात घेता अहमदनगर शहर व नगर तालुका यांसाठी स्वतंत्र कार्यक्षेत्राचे तहसील कार्यालय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

आमदार संग्राम जगताप यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर महसूलमंत्री विखे यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना नगर शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Back to top button