3269 जोडप्यांच्या संसाराची नवी सुरुवात, दिलासा सेलची कामगिरी | पुढारी

3269 जोडप्यांच्या संसाराची नवी सुरुवात, दिलासा सेलची कामगिरी

रोहिणी पवार : 

नगर : वादासह अन्य कारणामुळे संसाराचा गाडा तुटण्याच्या मार्गावर असलेली संसार पुन्हा मार्गावर आणण्यात पोलिसांच्या दिलासा सेलला यश आले. त्यांच्यासमोर आलेल्या मागील वर्षे व चालू वर्षी असणार्‍या तक्रारी तीन हजार 269 जोडप्यांचे मनोमिलन घडवून, त्यांच्या संसाराला उभारी देण्यात आली आहे. महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोजके अपवाद वगळता स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा उदासीन असतात. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या दिलासा सेलने मात्र महिलांच्या न्याय हक्कासाठी व त्यांना आधार देण्यासाठी यशस्वी कामगिरी केली आहे. या सेलच्या माध्यमातून 3269 महिलांचे विसरलेले संसार सावरले आहेत. नवरा- बायको, सासु -सुनेचे, भांडणे व इतर कारणामुळे तसेच अलीकडच्या काळात इंटरनेटच्या वापरामुळे संसार थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत होते. दिलासा सेलच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक पल्लवी देशमुख यांनी समुदेशन करत या संसारांना सावरण्याचे काम केले.

मानसोपचार, विधिविषयक, स्वतंत्र केस, प्रोफाईल, महिला हेल्पलाईन, वैद्यकीय सेवा, कौटुंबिक हिंसाचारासाठी संरक्षण अधिकार, पीडित महिलांना सहाय्य, समुपदेशन, असे सर्व सहाय्य त्यांना दिले जाते. तक्रारी स्वीकारण्यासाठी दिलासा सेलचे दरवाजे चोवीस तास उघडे असतात. 100 क्रमांकावर तक्रारी स्वीकारल्या जातात. पीडितांच्या मानसिकतेचा विचार करून तिचे समुपदेशन करणे, आवश्यकता असल्यास निवासाची व्यवस्था देखील केली जाते. दिलासा सेलकडून पूनर्वसन होत नाही. तोपर्यंत पीडितांची तक्रार बंद करण्यात येत नाही.
                                                   – उमेश इंगवले, पोलिस कर्मचारी.

आतापर्यंत अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी 90 टक्के प्रकरणे संशय, आणि मोबाईलचा अतिरिक्त वापर, संसार विस्कटण्याची कारणे आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाचे दिलासा सेल खर्‍या अर्थाने यशस्वीरित्या उतरले आहेत. 70 ते 80 टक्के तक्रारी या संशय, मोबाईलचा अतिरिक्त वापरामुळे वाद विकोपाला जातो. कुटुंबात पती व पत्नीमध्ये सहनशीलता नसल्याने किरकोळ कारणांचे वाद संसार उद्ध्वस्त करतात. पालकांनी आपल्या मुलामुलींचे लग्न करताना आधी त्यांना कौटुंबिक संस्कार द्यावे, तसेच मुलींना लग्नाच्या आधी आर्थिकद़ृष्ट्या सबल करावं. एखादी महिला आर्थिकद़ृष्ट्या सक्षम असेल, तर त्यावेळी ती 50 ते 70 टक्के तयार झालेली असते.
                                -पल्लवी देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल.

Back to top button