राहुरी : सासूच्या मृत्यूनंतर सुनेने सोडले प्राण | पुढारी

राहुरी : सासूच्या मृत्यूनंतर सुनेने सोडले प्राण

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेने देखील अखेरचा श्वास घेतला. सासू व सून दोघी मिळून मृत्यू नंतरच्या प्रवासाला लागल्या. सासू-सुनेचे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली. राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात शेजूळ कुटुंब रहावयास आहे.

त्या कुटुंबातील सासू-मालनबाई पांडुरंग शेजूळ यांना दि. 7 रोजी पहाटेच्या दरम्यान अचानक त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, पहाटे एक वाजे दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्या मृत पावल्या. काही वेळातच सुन- मिराबाई भाऊसाहेब शेजूळ (वय 55) यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सासू मृत झाल्याचे समजताच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि पहाटे दीड वाजेदरम्यान म्हणजे सासू मृत झाल्याच्या अवघ्या अर्ध्या तासानंतर सुनानेही अखेरचा श्वास घेतला. सुनाने अखेरच्या श्वासापर्यंत सासूची साथ सोडली नाही. मृत्यूनंतरच्या प्रवासाला देखील दोघी बरोबरच राहिल्या. मृत्यूनंतर सासू मालनबाई व सून मीराबाई या दोघींची अंत्ययात्रा एका मागे एक त्यांच्या घरापासून ते गणपती घाटापर्यंत नेण्यात आल्या. अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Back to top button