कृष्णा नदीतील मासे मृत्यूमुखी प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका | पुढारी

कृष्णा नदीतील मासे मृत्यूमुखी प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कृष्णा नदीमध्ये दुषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अ‍ॅड.असीम सरोदे यांच्या मदतीने सोमवारी याचिका दाखल केली.

पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. राजू शेट्टी यांच्यासह प्रकाशतात्या बालवडकर, अनिल बाळू मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले, बाळगोंडा म्हदगोंडा पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व स्वतः शेतकरी सुद्धा याचिकाकर्ते आहेत.

कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळी मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडले जात असल्यामुळे आणि नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे नदीतील जलचर संकटात आले आहेत. नदीतील पाणी प्रदुषित झाल्याने मासे मृत होत आहेत. प्रक्रिया न करता महापालिकेद्वारे कृष्णा नदीत सांडपाणी सोडले जाते. कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही आणि दरवेळी केवळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते, असा आरोप याचिकाकर्ते राजू शेट्टी यांनी याचिकेतून केला आहे.

हरिपूर येथे नदी काठाला मृत मासे येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच पडला होता. मृत माशे झुंडीने काठाला येत असल्याचे दिसून आले. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. लहान माशापासून आठ-दहा किलो वजनाचे मासे देखील या ठिकाणी आता मृत झाल्याचे आढळून आले आहे. मासे मृत झाले आहेत त्या भागातील पाणी व सांगलीमध्ये शेरी नाला ज्या ठिकाणी नदीला मिळतो त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी घेतले असून पाणी प्रदुषण होण्यामागील निश्चित कारण लवकरच स्पष्ट होईल. अंकली पूलाजवळ काही मृत मासेही मत्स्यविकास मंडळाच्या अधिकऱ्यांकडून ताब्यात घेण्यात आले असून मासे मृत होण्यामागील कारण या तपासणीतून स्पष्ट होईल. शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी व पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यासह अ‍ॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी, अ‍ॅड. सुघांशी रोपिया इत्यादी न्यायालयीन काम बघत आहेत.

पर्यावरणहित याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाचे न्या.डी.के.सिंग व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या समक्ष होईल. पर्यावरणाची हानी, मास्यांच्या मृत्यूसाठी जबादार असलेल्या प्रत्येकाच्या बेजबाबदारपणाचा हिशोब होईल.
– अ‍ॅड.असीम सरोदे

नदी प्रदुषित होण्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बघ्याची भूमिक घेतली जात आहे. कारखान्यातील मळी कृष्णा नदीत सोडल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात जलचर जीवनाचा नाश झाला व जैवविविधता नष्ट झाली हे स्पष्ट असतांनाही साखर कारखान्याला कारवाई पासून अभय का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

Back to top button