चिंता वाढली ! उरला केवळ दोन महिन्यांपुरताच चारा !
नगर : पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी कमी पाऊस झाला. ओढे-नाले वाहिले नाहीत. अपेक्षित पाणी पातळीही वाढली नाही. त्यामुळे छोटे-मोठे तलाव, धरणांचा घसा उन्हाळ्याची चाहूल लागताच कोरडा पडू लागला आहे. सध्या जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहेत, तर दोन महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता टंचाई उपाययोजनांसाठी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्याबाहेर चारा पाठविण्यास निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात धरण लाभक्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प होते. त्यामुळे पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही.
परिणामी विहिरी, बोअरवेल्स कोरडे पडताना दिसत आहे. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यातून उन्हाळ्यातील भीषण चारा आणि पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार एप्रिलपर्यंत एवढा चारा उपलब्ध आहे. त्यानंतर टंचाई जाणवलीच तर छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्याचेही नियोजन सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. तसेच पाणीटंचाई जाणवताच मागणीनुसार टँकर सुरू करण्यासाठीही प्रशासन अनुकल असल्याचे सांगितले जाते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील टंचाई उपाययोजनांबाबत आढावा घेताना दिसत आहे.
जनावरे आणि चार्याची परिस्थिती
लहान जनावरे : 2,76,115
मोठी जनावरे : 13,23,543
शेळ्या मेंढ्या : 14,79,803
महिन्याचा चारा : 7,90,902 टन
शिल्लक चारा : 25,10,000 टन (सुमारे)
चारा कधीपर्यंत पुरेल : एप्रिल अखेरपर्यंत
उपाययोजना : शासकीय दराने मुरघास, चारा खरेदी
टँकरची सध्यस्थिती
जिल्ह्यात टँकर : 12
संगमनेर : 3, पाथर्डी 9,
दररोज खेपा : 47
गावे : 15
वाड्या : 63
लोकसंख्या : 28,204
उपाययोजना : मागणीनुसार टँकर सुरू करणार