महापराक्रमी, महाबुद्धिमान संभाजीराजे | पुढारी

महापराक्रमी, महाबुद्धिमान संभाजीराजे

अर्ध्या आशिया खंडावर सत्ता असणार्‍या औरंगजेब बादशहाला सह्याद्रीमध्ये जखडून ठेवत हतबल करण्याचे कार्य संभाजीराजांनी केले. त्यांनी प्राणाचे बलिदान दिले; परंतु शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य मोगलांच्या स्वाधीन केले नाही. संभाजीराजांच्या त्यागाला, समर्पणाला, शौर्याला, विद्वत्तेला, निष्ठेला जगाच्या इतिहासात तोड नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केेलेल्या स्वराज्याचे अत्यंत निष्ठेने, निर्भीडपणे आणि तळमळीने संवर्धन आणि रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती संभाजीराजांनी केले. शिवरायांच्या मृत्यूसमयी शंभूराजे अवघे 23 वर्षांचे होते. औरंगजेब बादशहा सुमारे सहा लाखांची फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला. विजापूरचा आदिलशहा, जंजिर्‍याचा सिद्दी, गोवेकर पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज आणि अंतर्गत सनातनी मंत्री या सर्वांनी संभाजीराजांना घेरले; परंतु या सर्वांविरुद्ध अखंड नऊ वर्षे संभाजीराजे निकराने लढले. त्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले. औरंगजेबाचा अपेक्षाभंग झाला. हतबल झालेल्या औरंगजेबाने डोक्यावरील किमॉश उतरवला आणि म्हणाला, ‘संभाजीचे पारिपत्य केल्याशिवाय तो डोक्यावर धारण करणार नाही.’ याची नोंद कारवारकर इंग्रजांनी 1682 च्या पत्रात घेतलेली आहे.

संभाजीराजे निद्रेचे चार तास सोडले, तर सतत 20 तास मोगल, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आणि सनातन्यांविरुद्ध लढत होते. बुर्‍हाणपुरापासून सोलापूरपर्यंत संभाजीराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले, तेव्हा मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफी खान म्हणतो, ‘शिवाजीराजे आम्हा मोगलांना जेवढे तापदायक होते, त्यांच्यापेक्षा संभाजीराजे मोगलांसाठी दहा पटीने तापदायक आहेत.’ खाफी खानाने केलेल्या वर्णनावरून संभाजीराजांच्या शौर्याची, धैर्याची कल्पना येते. संकटसमयी संभाजीराजे लढणारे होते, रडणारे नव्हते. एकाच वेळेस अनेक आघाड्यांवर ते लढत होते. हंबीरराव मोहितेंसारखे पराक्रमी, प्रामाणिक आणि स्वराज्यनिष्ठ सरसेनापती त्यांना लाभले होते.
संभाजीराजांना ऐन तारुण्यात प्रत्यक्ष पाहणारा फ्रेंच पर्यटक अ‍ॅबे करे लिहितो, ‘संभाजीसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात अन्यत्र पाहिला नाही.’ अ‍ॅबे करे हा समकालीन आहे. तो पर्यटक होता. तो तटस्थ होता. त्यामुळे त्याने केलेले संभाजीराजांचे वर्णन अचूक असेच आहे. उत्तरकालीन बखरकार, कादंबरीकार, नाटककारांनी केलेल्या प्रतिमाहननाला ऐतिहासिक आधार नाही. समकालीन संभाजीराजांच्या शौर्याचे, पराक्रमाचे, त्यागाचे, निर्भीडपणाचे, स्वराज्यनिष्ठेचे, पांडित्याचे आणि सौंदर्याचे मुक्तकंठाने कौतुक करतात.

संभाजीराजेंनी प्रजेवर जीवापाड प्रेम केले. वयोवृद्ध आणि समवयस्क सैनिकांना आदराने वागविले, असे अ‍ॅबे करे सांगतो. समकालीन इटालियन पर्यटक निकोलाओ मनूची संभाजीराजांच्या धाडसाचे, स्वाभिमानाचे आणि राजशिष्टाचाराचे वर्णन त्याच्या प्रवासवर्णनात करतो. ऐन कुमार वयात संभाजीराजांवर स्वराज्यरक्षणाची जबाबदारी पडली. ती मोठ्या ताकदीने त्यांनी पेलली. एका बाजूला ते स्वराज्य रक्षणासाठी लढत होते, तर दुसर्‍या बाजूला ते स्वराज्यातील जनतेला न्याय देत होते. महिलांना संंरक्षण देत होते. शेतकर्‍यांना दिलासा देत होते.

संभाजीराजे हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. ते म्हणतात, ‘जे प्रयत्नवादी असतात ते पुरुषसिंह असतात. ज्यांचा नशिबावर विश्वास असतो त्यांना का पुरुष म्हणतात? यश मिळविण्यासाठी पूजा-पाठ नव्हे, तर प्रयत्नवादी असले पाहिजे. त्यांनी महिलांचा आदर, सन्मान केला. आजी जिजाऊंचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. मातोश्री सोयराबाईंचा आदर-सन्मान केला. त्यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेतली. महाराणी येसुबाईला सर्वाधिकार दिले. ‘श्री सखी राज्ञी’ हा बहुमान दिला. बंधू राजारामाला प्रेमाने वागविले. राजारामाचे विवाह लावून दिले. भावजय ताराराणी यांना सर्वाधिकार दिले. संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

शिवरायांना शंभूराजांबद्दल प्रचंड अभिमान होता. बालपणापासूनच शंभूराजांना स्वराज्यनिर्मितीचे धडे शिवरायांनी दिले. शिवरायांनी त्यांना दहा हजार सैन्य घेऊन गुजरात मोहिमेवर पाठविले तेव्हा संभाजीराजे फक्त पंधरा वर्षांचे होते, याचे वर्णन अ‍ॅबे करेने केले आहे. शिवाजीराजांनी त्यांना आग्र्‍याला नेले. कोकण, पन्हाळा, औरंगाबाद येथील जबाबदारी सोपवली. शिवाजीराजे पन्हाळा मुक्कामी जेव्हा संभाजीराजांना म्हणाले की, “दक्षिणेकडील राज्य तुम्हाला आणि उत्तरेकडील राजारामाला,” तेव्हा संभाजीराजे शिवरायांना म्हणाले “दूध-भात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन; परंतु राज्याची वाटणी नको.” यावरून स्पष्ट होते की, संभाजीराजे सत्ताभिलाषी नव्हते, तर ते शिवनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ, नि:स्वार्थी होते. ते जसे निर्भीड होते तसेच ते नि:स्वार्थी होते. त्यांच्या सल्ल्यावरून शिवरायांनी दुसरा राज्यभिषेक केला.

संभाजीराजे स्वत: संस्कृत भाषेचे विद्वान होते. ‘बुधभूषण’सारखा अभिजात संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. तसेच ‘नखशिख’, ‘नायिकाभेद’ आणि ‘सातसतक’ हे तीन हिंदी ग्रंथ त्यांनी लिहिले. औरंगजेबाला दक्षिणेत गुंतवून उत्तर भारत जिंकण्याची संभाजीराजांची महत्त्वाकांक्षा होती, यासाठी औरंगजेबपुत्र शहाजादा अकबराची संभाजीराजांना साथ होती. संभाजीराजांच्या पराक्रमाचे, विद्वत्तेचे वर्णन इंग्रजांनी केलेले आहे. मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांना पराभूत करण्याचा प्रयत्न संभाजीराजांनी केला. जंजिरा द़ृष्टिक्षेत्रात आला आणि औरंगजेब महाराष्ट्रात उतरला; पण संभाजीराजे शेवटच्या क्षणापर्यंत रयतेच्या स्वराज्यासाठी लढत होते. अर्ध्या आशिया खंडावर सत्ता असणार्‍या औरंगजेब बादशहाला सह्याद्रीमध्ये जखडून ठेवण्याचे आणि त्याला हतबल करण्याचे महान कार्य संभाजीराजांनी केले. संभाजीराजांनी प्राणाचे बलिदान दिले; परंतु शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य मोगलांच्या स्वाधीन केले नाही. संभाजीराजांच्या त्यागाला, समर्पणाला, शौर्याला, विद्वत्तेला, निष्ठेला जगाच्या इतिहासात तोड नाही. संभाजीराजांनी प्राणार्पण केले; पण कोणत्याही स्वरूपाची तडजोड केली नाही.

– डॉ. श्रीमंत कोकाटे,
इतिहास अभ्यासक

Back to top button