श्रीदेवीचे पार्थिव आज मुंबईत आणणार
दुबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे रविवारी पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन दुबईतच करण्यात येणार असल्याने त्यांचे पार्थिव भारतात आणण्यास वेळ होत आहे. फॉरेंसिक तपास अहवाल तयार झाल्यानंतर श्रीदेवीचे पार्थिव खास विमानाने आज मुंबईत आणण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर मुंबईतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दुबईतील कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांचे पार्थिव आणण्यासाठी उशीर होणार आहे. मात्र, मृत्यूची बातमी समजल्यापासूनच चाहत्यांनी मुंबईतील त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. तसेच अनुपम खेर, शिल्पा शेट्टी आदींनी अनिल कपूर यांच्या घरी भेट देत कपूर परिवाराचे सांत्वन केले.
एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेलेल्या श्रीदेवींची प्राणज्योत मालवल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मृत्युसमयी त्यांच्यासोबत त्यांचे पती बोनी कपूर, लहान मुलगी खुशी होती. तर मोठी मुलगी जान्हवी चित्रिकरणानिमित्त मुंबईत होती.