कलाईडोस्कोप : गांभीर्याने विचार करा
लग्नाशिवाय एकत्र राहणार्या किंवा ‘लिव-इन’ मध्ये असलेल्या जोडप्यांनी काही बाबींचा विचार नक्कीच करावा. या नात्याकडेही अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज असते. केवळ काही काळाची मजा असं त्याचं स्वरूप असेल, तर त्याचा पुढे त्रास होण्याची शक्यता अधिक.
अनेकदा लग्नाच्या बंधनात कायमचं गुंतवून घेण्याच्या आधी, कित्येक जोडपी, लिव इन मध्ये राहू इच्छितात. यामध्ये आपण निवडलेल्या जोडीदाराला अधिक समजून घेणे, एकमेकांचे विचार जुळतायत का हे पाहणे हा उद्देश असतो. तिथे एकमेकांसोबत मोकळेपणा ठेवून, आपापल्या स्वभावानुसार नैसर्गिक वागणे हितावह. यांतून वागण्या-बोलण्याने दडपण राहत नाही. केवळ आपल्या आजुबाजुचे इतर लोक, मित्र-मैत्रीणी या नात्यात आहेत, किंवा असं नातं म्हणजे आपण पुरोगामी, पुढारलेले असल्याचा सबळ पुरावा आहे; इत्यादी कारणांनी लिव इन मध्ये असणे धोकादायक! जोडीदार असावा ही वैयक्तिक गरज, इच्छा असूनही लग्नाविषयी साशंकता असेल तर अनेक व्यक्ती याचा विचार करताना दिसतात.
लग्न किंवा लिव-इन, दोन्हीमध्येही सगळं केवळ गोड गोड , छान राहील किंवा सर्व संभावित धोके कळतील ही अपेक्षा व्यर्थ. त्यामुळे प्रसंगानुरूप बदल इथेही आहेतच! अनेकदा घटस्फोटीत व्यक्तींना पुन्हा लग्नाच्या नात्यात अडकणे नकोसे वाटते, परंतु जोडीदार असावा ही इच्छा असतेच. तिथे अनेकदा ‘लिव इन’बाबत गांभिर्याने विचार होतो. लग्नाप्रमाणेच, ‘लिव इन रिलेशनशिपचा’ गांभिर्याने विचार झाला तर ते नातं ही उथळ राहणार नाही!