पैशाचा प्रवाह कसा असावा? | पुढारी

पैशाचा प्रवाह कसा असावा?

आपल्या कुटुंबामध्ये विविध मार्गांनी येणार्‍या उत्पन्नाच्या स्रोताला ‘कॅश फ्लो’ म्हणतात. प्रत्येक कुुुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असतात. पगार, गुंतवणुकीवरील व्याज, शेअर्स, म्युच्युअल फंडांवरील लाभांश, शेतीतील उत्पन्न, मालमत्तांचे भाडे अशा ठिकाणाहून अनेक मार्गांनी उत्पन्न मिळत असते किंवा व्यवसायाच्या ठिकाणाहून फायद्याच्या स्वरूपात उत्पन्न लाभते. उत्पन्नाचा स्रोत एकापेक्षा अनेक असल्यावर कुटुंबाचा कॅश प्लो निगेटिव्ह जात नाही.

निरंतर पैशाच्या प्रवाहामधून दैनंदिन जीवनासाठी लागणारा खर्च आपण करीत असतो. आपल्या कुटुंबामध्ये येणार्‍या उत्पन्नातून दरमहा होणारा खर्च वजा जाऊन रक्कम शिल्लक राहत असेल, तर आपल्य कुुटुंबाचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे, असे समजावे. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातून किती रक्कम शिल्लक राहते, हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. जर कुुटुंबात येणार्‍या एकूण उत्पन्नातून 30% ते 40% रक्कम शिल्लक राहत असेल, तर तुमच्या कुुटुंबाचे आर्थिक भविष्य उज्ज्वल समजावे. जर घरात येणार्‍या एकूण उत्पन्नापेक्षा खर्च मोठा होत असेल, दैनंदिन खर्चासाठी बाहेरून आणखी जादा पैसे उसने आणावे लागत असतील, तर आपल्या कुटुंबाचा कॅश फ्लो निगेटिव्ेह आहे, असे समजावे. असे घडत असेल तर मात्र भविष्यात आपली आणखी बिकट अवस्था येणार आहे, हे लक्षात ठेवावे. त्यासाठी कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. घरातील वायफळ खर्च कोठे होतो ते समजून घेत तो शक्य तितका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कुटुंबामध्ये येणारा पैसा विविध मार्गांनी येणे कधीही चांगले. कारण एखादा मार्ग बंद झाला, तर दुसर्‍या मार्गाने पैसा आलाच पाहिजे. जसे जगण्यासाठी प्रत्येकाला जगण्यासाठी अनेक साधनांची गरज भासते. ही सर्व साधने विकत घ्यायला नेहमीच पैसा लागतो. ऐनवेळी आपल्याकडे पैसा नसले, तरी खर्च मात्र थांबत नाही. त्यासाठी दुसर्‍या कोणाकडूनही तो उपलब्ध करावाच लागतो. प्रत्येक कुुटुंबामध्ये असणारा प्रमुख महिनाभर काम करून दरमहा घरात पैसे उपलब्ध करतो. घरात पैशाचा प्रवाह चालूू आहे, तोपर्यंत सर्व काही ठीक असते. त्यावेळी पैशाची अडचण कधी भेडसावत नाही. मात्र, अशा काही अनपेक्षित घटना घडल्यास नेहमीच्या खर्चासाठी येणारा पैशाचा प्रवाह थांबतो. मग संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होते. परिणाम म्हणजे आर्थिक उत्पन्न थांबते व कुुटुंब आर्थिक अडचणीत येते. याचा सारासार विचार केल्यास आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतील.

खालील मुद्दे यासाठी महत्त्वाचे आहेत.

1) जर कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला, तर तो जितके पैसे मिळवून घरी आणत होता, तितक्या पैशाचा प्रवाह (Cash Flow) त्या कुटुंबामध्ये नियमितपणे पुढेही चालू असायला हवा.

2) कुटुंबप्रमुखाचा अपघात झाला अथवा तो आजारी पडला अन् त्याला काम करता येत नसेल, तर त्याचा पगार आणि व्यवसायातून जितके उत्पन्न घरी येत होते, तितके पैसे दरमहा घरी (Cash Flow) येत राहिले पाहिजेत.

3) कुटुंबप्रमुख रिटायर झाल्यावर त्याचे शेवटच्या महिन्यात जितके उत्पन्न होते, तितके उत्पन्न निर्माण करण्याची साहजिकच गरज भासते. रिटायर झाल्यावर त्याचा मासिक पगार मिळत नाही. अशा वेळी कुटुंबाला आर्थिक प्रवाहाची जास्त गरज भासते.

4) सध्याच्या स्पर्धात्मक काळात कोणता व्यवसाय कधी बंद पडेल, हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. जर तो व्यवसाय अचानक बंद पडला, तर त्याचे उत्पन्नही थांबणार. व्यवसायात केलेली गुंतवणूक तोट्यात जाते, त्याचबरोबर कुुटुंबात येणार्‍या पैशाचा प्रवाह बंद होतो.

प्रत्येक व्यक्ती ठराविक वयापर्यंत कष्ट तसेच कौशल्य पणाला लावून पैसे मिळविते. ठराविक काळानंतर म्हणजेच रिटायरमेंटनंतर उत्पन्नाचा प्रवाह थांबतो अथवा वरीलप्रमाणे एखादी अनपेक्षित घटना घडल्यानंतर पैशाची निकड कशी भागवायची? असा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहतो. म्हणून कुटुंबप्रमुखाने प्रथमपासूनच आर्थिक नियोजन करून त्याप्रमाणे प्रत्यक्षात पैशाची तजवीज केली, तर कधीही आर्थिक प्रवाह थांबत नाही.

ज्यावेळी आपला आर्थिक स्रोत सुरू होतो, त्यावेळी पै पै साठवून त्याची बचत अथवा गुंतवणूक करून भविष्यात आपण मोठा फंड उभारू शकतो. आपल्या रिटायरमेंटनंतर आपल्याला किती पैसे लागतील, याचा आराखडा अगोदरच मांडायला हवा.

आर्थिक नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबात काटकसरीची सवय लावली पाहिजे. कमी खर्चात गरजा पूर्ण कशा करता येतील, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांच्या चैनीच्या इच्छा असतील, तर त्यांना मुरड घालता आली पाहिजे. कारण आपण हाती आलेला पैसा कसाही खर्च केला, तर बचत होणार नाही. प्रत्येक कुटुंबातील आर्थिक स्रोत नेहमी वाढत गेला पाहिजे. कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न कमी-जास्त होऊ शकते. कुुटुंबातील विविध खर्च, कमी होणारे व्याज, त्याचबरोबर वाढते आयुष्यमान, अपुरे भांडवल या सर्व गोष्टींचा विचार कुटुंबप्रमुख या नात्याने त्याला करावा लागतो.

आपल्या कुुुटुंबातील आर्थिक स्रोत कायम तसेच वाढता ठेवणे आजच्या महागाईच्या काळात आव्हानच असते. आर्थिक स्रोताचे व्यवस्थापन कसे हवे? हे समजावून घेताना आपल्या कुटुंबाचा वाढता खर्च, भविष्यातील मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा, तसेच कमी होणारे व्याजदर, जागतिकीकरणाच्या व्यापारामध्ये तेजी-मंदी या सर्व घटकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आजचे वय व भविष्यातील आयुर्मर्यादा विचारात घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक स्रोत तयार करणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी दूरद़ृष्टी ठेवून त्याचे नियोजन करणे अवघड काम आहे.

आपला आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असते. भरपूर पैसे मिळविणे फार मोठी अवघड गोष्ट नाही. मात्र, आलेल्या पैशातून खर्च करून शिल्लक ठेवणे, वाचवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतविणे, त्या पैशातून अधिक नफा मिळविणे, ही कला आत्मसात करून अंमलात आणणे मोठी अवघड गोष्ट आहे. यामध्ये आर्थिक निरक्षरता असणे ही पैशाच्या व्यवस्थापनात अडसर ठरणारी मोठी समस्या आहे. त्यामुळे हाती आलेल्या पैशाचे योग्य नियोजन होत नाही.

सर्वप्रथम आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा, भविष्यात खर्चात होणारी वाढ याचा विचार कुटुंबातील सदस्यांनी चर्चा करून केला पाहिजे. त्यानंतर खर्च लिहून काढणे. वर्षातून एकदा तसेच सहा व तीन महिन्यांतून एकदा येणारे मोठे खर्च विचारात घेऊन त्यासाठीचे पैसे बाजूला ठेवणे आकस्मिक तसेच दैनंदिन खर्चाचे बजेट आताच तयार करणे. कर्जे व देणी कमी करणे. उत्पन्न वाढविणे किंवा पूर्वीच्या उत्पन्नात आपल्या कुुटुंबाचा खर्च भागविण्याचा प्रयत्न करणे. उत्पन्नाचे स्रोत वाढविणे. यासाठी खालीलप्रमाणे नियोजन करता येईल.

अनिल पाटील

Back to top button