मधुमेह आणि फळे | पुढारी | पुढारी

मधुमेह आणि फळे | पुढारी

मधुमेह या रोगाला पूर्वी श्रीमंतांचा रोग असे मानले जायचे; परंतु आता परिस्थिती पालटली आहे. आहारशैली आणि जीवनशैलीचा परिणाम म्हणून मधुमेह होण्याचे प्रमाण अधिक वाढतेय. अर्थात, संतुलित योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. 

मधुमेहाच्या व्यक्तींनी आहाराबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. मधुमेहींना ठरावीक वेळेला आहार सेवन करावा लागतो. एखादा भुकेला फळे खाऊ शकतो; मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींना सर्वच फळे सेवन करणे चालतील, असेही नाही. त्यामुळेच मधुमेही व्यक्तींना आहाराबाबत सतर्क असावे लागते. आहारात फळे सामील करतानाही सजग राहिले पाहिजे. फळांमध्ये नैसर्गिक साखर असली तरी मधुमेही व्यक्तींसाठी ही फळे टाळणेच योग्य आहे.

मधुमेह हा आजार असलेल्या व्यक्तींनी आहाराबाबत सजग राहणे आवश्यक असते. विशेषतः, फळांचे सेवन करताना काळजी घेतली पाहिजे; अन्यथा या फळांच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. बर्‍याच जणांचा असा गैरसमज असतो की, फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने रक्तातील साखर वाढत नाही. फळे सेवन केलेली चालतात असे मानून मधुमेहाचे रुग्ण फळांचे सेवन करतात; पण फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर हानिकारक ठरू शकते. 

चेरी मधुमेहात हानिकारक ः चेरीमध्ये खूप जास्त साखर असते. त्यामुळेच आइस्क्रीम आदी गोष्टी तयार करण्यासाठी चेरीचा वापर केला जातो. एका चेरीमध्ये सुमारे 8 ग्रॅम साखर असते. त्यामुळे चेरीचे सेवन करताना काळजी घेतली पाहिजे आणि विशिष्ट प्रमाणातच चेरीचे सेवन केले पाहिजे. चेरीचे सेवन रक्तातील शर्करेची पातळी वाढवू शकते. 

आंबा ः आंबा हा वर्षातून एकदाच मिळणार्‍या फळांपैकी एक आहे आणि बहुतेकांना आंबा खूप आवडतो; पंरतु त्यातही नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याचे सेवन करणे शक्यतो टाळले पाहिजे. सर्वसाधारणपणे एका आंब्यामध्ये  45 ग्रॅम इतकी नैसर्गिक साखर असते. 

द्राक्षे ः रक्तातील साखरेची पातळी योग्य राखायची असेल तर द्राक्षाचे सेवन करणे टाळावे. कारण, द्राक्षेही खूप गोड असतात. 

एक कप द्राक्षांतून शरीरात 23 ग्रॅम साखर जाऊ शकते. 

डाळिंब ः डाळिंब रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते; परंतु त्यातही साखरेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे सेवन केल्यास मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. एका साधारण आकाराच्या डाळिंबामध्ये 39 ग्रॅमपर्यंत साखर असते. मधुमेही रुग्णांना डाळिंबाचे सेवन टाळले पाहिजे. 

लिची ः हे फळही जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या फळांपैकी एक आहे. त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. एक कप लिची फळांमध्ये 29 ग्रॅम एवढी नैसर्गिक साखर असते. 

मधुमेही रुग्णांनी वरील फळे टाळावीत, तसेच कोणतेही इतर फळ सेवन करताना विशिष्ट प्रमाणातच सेवन करावे, जेणेकरून रक्तशर्करेचे प्रमाण योग्य राहील. मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर कमी होऊ द्यायची नसते तशीच ती वाढूनही उपयोग नाही. त्यामुळे ठरावीक वेळेला आहार सेवन करतानाही तो योग्य प्र्रमाणात सेवन करावा. 

Back to top button