क्रीडा : शार्दुलची ठाकूरगिरी | पुढारी

क्रीडा : शार्दुलची ठाकूरगिरी

सुनील डोळे

किस्मत हमेशा बहादूरों का साथ देतीहै… असे म्हटले जाते. मराठमोळा प्रतिभावंत क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरच्या बाबतीत ही उक्ती शंभर टक्के खरी ठरली आहे. ओव्हल (लंडन) येथील चौथ्या क्रिकेट कसोटीत इंग्लिश संघाला खिंडार पाडले ते याच ठाकूरने. या ठाकूरगिरीच्या जोरावरच विराट कोहलीच्या भारतीय संघाने जो रूटच्या इंग्लंड संघाला त्यांच्याच भूमीत सपशेल लोळवले. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता पाहुण्या भारतीय संघाने 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतलीआहे.

ओव्हलवरील विजय सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला असून यात मोलाची भूमिका बजावली ती शार्दुलने. इंग्लंडच्या बिनबाद शंभर धावा झालेल्या असताना सलामीवीर रोरी बर्न्सला शार्दुलनेच तंबूत पाठवले व त्यानंतर भारताने मागे वळून पाहिलेच नाही. पालघरच्या या गुणी खेळाडूने इंग्लंडच्या उरात धडकी भरवली. विशेषतः जो रूटचा त्रिफळा उडवून त्याने भारतासाठी विजयाचे दरवाजे उघडले. त्यावर कळस चढवला तो जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने. महंमद सिराजनेही जबरदस्त मारा केला; पण दुर्दैवाने तो बळी मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.

अर्थात हा विजय म्हणजे सर्वार्थाने सांघिक कामगिरीचा आविष्कार होता हे खरेच. तथापि सामन्याला कलाटणी देणारी कामगिरी केली ती शार्दुलने. कारण या संपूर्ण मालिकेत आतापर्यंत इंग्लंडचा संघ कर्णधार जो रूटच्या बळावरच वाटचाल करतो आहे. जसे एकेकाळी भारतीय संघ म्हणजे सुनील गावस्कर असे समीकरण बनले होते. रूटने या मालिकेत तुफानी फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याचाच बळी ओव्हल कसोटीत निर्णायक ठरणार होता. कर्णधार विराट कोहली म्हणाला, ‘ठाकूर मुझे ये रूट चाहिये…’ झालेही तसेच. शार्दुलने रूटचा त्रिफळा उद्ध्वस्त करून इंग्लंडच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. एवढेच नव्हे तर या जिगरबाज खेळाडूने दोन्ही डावांत अर्धशतक (अनुक्रमे 57 आणि 60) ठोकून आपले अष्टपैलुत्वही सिद्ध केले. मात्र, हे यश शार्दुलला साडे माडे तीन असे एका रात्रीत मिळालेले नाही. अपार मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर तो आज नावारूपाला आला आहे.

मुुंबईपासून जवळच असलेले पालघर हे त्याचे गाव. 16 ऑक्टोबर 1991 ही त्याची जन्मतारीख. वडील नरेंद्र हे नारळाचे व्यापारी तर आई हंसा या गृहिणी. घरची परिस्थिती सर्वसामान्य. महानगरी मुंबईपासून जवळ असले तरी पालघर हे तसे छोटेच. क्रिकेटच्या कसल्याही सुविधा तेथे नव्हत्या. त्यामुळे शार्दुलने बोईसर येथे जायचे ठरवले. कारण तिथे त्याचे स्वप्न साकारणार होते. रोज सुमारे शंभर किलोमीटरचा प्रवास आणि खांद्याला क्रिकेटचे बोजड किट. मोठा क्रिकेटपटू व्हायचे आणि भारतासाठी खेळायचे या स्वप्नाने त्याला जणू झपाटले होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीनुसार शालेय पातळीवरच तो चमकायला सुरुवात झाली. असेच एका सामन्यात त्याने लागोपाठ सहा षटकार खेचले आणि तो चर्चेचा विषय बनला. तथापि, अजून त्याला बराच पल्ला गाठायचा होता.
भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना फलंदाजीतही तो आपली चमक दाखवू लागला. साहजिकच मुंबईच्या रणजी संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. 2013-14 च्या रणजी हंगामात या पठ्ठ्याने दहा सामन्यांत 48 बळी मिळवले. पण, त्याने खरी कमाल केली ती पुढच्या हंगामात. तेव्हा त्याने एका अप्रतिम चेंडूवर चेतेश्वर पुजाराला बाद केले व राष्ट्रीय निवड समिताला त्याच्या कामगिरीची दखल घेणे भाग पाडले. या संपूर्ण काळात त्याला मार्गदर्शन लाभले ते दिनेश लाड यांचे. या पोरात स्पार्क असल्याचे लाड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतले.

शार्दुल नामक कच्च्या हिर्‍यावर अशा प्रकारे पैलू पडत गेले… एवढी चमक दाखवल्यावर शार्दुलला 20 ऑक्टोबर 2018 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघात संधी मिळाली. त्या आधी तो टाटा स्पोर्टस् क्लब, मुंबई, पश्चिम विभाग, शेष भारत, भारत अ, भारत ब, इंडिया ब्लू, रायझिंग पुणे सुपर जायंट, चेन्नई सुपर किंग्ज, ठाणे स्ट्रायकर्स आदी संघांकडून खेळला. आयपीएलमध्ये त्याने विशेष चमक दाखवली. आयसीसी मानांकनाचा विचार केला तर सध्या कसोटीत तो 56व्या, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 75व्या तर टी-ट्वेंटीमध्ये 30व्या स्थानावर आहे. अंगी एवढी अफाट गुणवत्ता असली तरी आतापर्यंत अवघे चार कसोटी सामने त्याच्या वाट्याला आले असून त्यात त्याने 22.71 धावांच्या सरासरीने 14 बळी पटकावले आहेत तर फलंदाजीत 190 धावा कुटताना 38 ची सरासरी संपादली आहे. 67 ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होय. तसे पाहिले तर सुरुवातीपासूूनच क्रिकेट हा भारताचा लाडका खेळ. जगमोहन दालमिया आणि इंदरजितसिंह बिंद्रा यांनी अगदी सीमारेषासुद्धा विकून या खेळाला सर्वार्थाने मालामाल केले. त्यामुळे क्रिकेटमध्ये पैसा आला आणि रणजीपटूदेखील लखपती होत गेले. त्यानंतर आयपीएलचा उदय झाला. आयपीएलला कितीही हिणवले गेले तरी त्यातूनच अनेक गुणवंत क्रिकेटपटू देशाला गवसत गेले.

शार्दुल हा त्यापैकीच एक. आयपीएलमध्ये खेळताना आपले सगळे कसब पणाला लावून गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही विभागांत त्याने आपला ठसा उमटवला. त्यामुळे आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्याच्यावर लठ्ठ रकमेची बोली लावली जाणार हे समीकरण पक्के बनत गेले. येथे आवर्जून दखल घेण्याजोगी बाब म्हणजे आज हाच पालघरचा छोकरा तब्बल पाच दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा मालक आहे. जे स्वप्न त्याने उमेदवारीच्या काळात पाहिले होते, ते आज वास्तवात उतरायला सुरुवात झाली आहे. पैसा, यश, कीर्ती यांसारख्या सगळ्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागल्या आहेत.

शार्दुलची खासियत म्हणजे हे यश त्याने डोक्यात जाऊ दिलेले नाही. त्याच्या बाबतीत आतापर्यंत एकदाच वाद उत्पन्न झाला व तोदेखील जर्सीवरून. झाले असे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन झाल्यानंतर त्याने एकदा दहा क्रमांकाची जर्सी परिधान केली. हा जर्सी क्रमांक तर क्रिकेटच्या देवाचा म्हणजेच सचिन तेंडुलकरचा. त्यामुळे सोशल मीडियावरून मोठाच गदारोळ उडाला. शार्दुल वादाच्या भोवर्‍यात सापडला. अखेर त्याने या दहा क्रमांकाच्या जर्सीला कायमची सोडचिठ्ठी दिली आणि स्वतःच्या जर्सीसाठी 54 हा क्रमांक नक्की केला. दरम्यानच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दहा क्रमांकाची जर्सीच गोठवून टाकली. असो. हा एकमेव विषय सोडला तर शार्दुल कधीच वादाच्या भोवर्‍यात अडकलेला नाही. आजघडीला त्याचे वय आहे 29. त्याला अजून बरीच मजल मारायची आहे. हे खरे आहे की, त्याच्या रूपाने रवींद्र जडेजानंतर भारताला एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू गवसला आहे. मात्र, केवळ चार कसोटी सामन्यांच्या कामगिरीच्या आधारे त्याला लगेच महान बनवण्याची घाई माध्यमे आणि समीक्षकांनी करता कामा नये. एरव्ही इंग्लंडमध्येही इयान बोथमनंतर डेरिक प्रिंगलला दुसरा बोथम ठरवण्याची घाई त्या देशाच्या कशी अंगलट आली होती हे जुन्या जाणत्या रसिकांना आठवत असेल.

आपल्या देशातही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा टिळा लागल्यानंतर अल्पजीवी कारकीर्द ठरलेल्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने शार्दुलबाबत आतापासूनच माध्यमे आणि समालोचकांना सावध केले आहे. शार्दुलला वृषभ पंतप्रमाणेच आपला नैसर्गिक खेळ करू देण्याची मुभा द्यायला हवी. त्याच्यावर अपेक्षांचे ओझे लादणे भारतीय संघासाठी आणि खुद्द शार्दुलसाठी धोकादायक ठरू शकते. त्याची नुकतीच बहरू लागलेली कारकीर्द परिपक्व व्हायला हवी. सध्याच्या जागतिक क्रिकेटचा विचार केला तर भारतीय गोलंदाजी जगात सर्वोत्तम आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज या तोफखान्यात आता शार्दुलचा समावेश झाला आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर खेळण्याची अधिकाधिक संधी त्याला मिळणे गरजेेचे आहे. अर्थातच त्यासाठी त्याला आपल्या कामगिरीत सातत्य दाखवायला लागेल.

लक्षात घ्या, रविचंद्रन अश्विनसारखा कोहिनूर हिरा राखीव खेळाडूंमध्ये बसवण्याची चैनदेखील सध्या आपल्याला परवडते. सांगण्याचा मुद्दा असा की, भारतीय संघामध्ये सध्या कधी नव्हे एवढी तीव्र स्पर्धा सुरू आहे. त्यात टिकाव धरायचा तर जवळपास प्रत्येक सामन्यात शार्दुलला आपले सर्वोत्तम योगदान द्यावे लागेल. त्याला पर्याय नाही. एकीकडे मराठमोळा अजिंक्य रहाणे फॉर्मसाठी झगडत असताना शार्दुल ठाकूर या दुसर्‍या मराठी चेहर्‍याने देेशाच्या असामान्य विजयात मोलाचा वाटा उचलला आहे, ही बाब तमाम मराठी बांधवांसाठी अभिमानाची म्हटली पाहिजे.

शार्दुलची खासियत म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी तीनही प्रकारांत तो एकदम चपखल बसतो. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आवश्यक असलेली आक्रमकता व गुणवत्ता त्याच्यात ठासून भरली आहे. संघ अडचणीत असतानाच कोणत्याही खेळाडूचा सर्वार्थाने कस लागतो. ओव्हल कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी ढासळत चाललेली असताना शार्दुलने जी मर्दुमकी आपल्या बॅटद्वारे गाजवली त्याला तोड नाही. त्यामुळे नजीकच्या काळात त्याला फलंदाजीतही प्रमोशन मिळाले तर आश्चर्य वाटू नये. कपिलदेव हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम अष्टपैलू होय. त्या दिशेने शार्दुलची वाटचाल व्हावी ही अपेक्षा गैरवाजवी ठरू नये.

Back to top button