‘शपथविधीपूर्वी नाव घेण्याची प्रथा भाजपची’ | पुढारी

'शपथविधीपूर्वी नाव घेण्याची प्रथा भाजपची'

मुंबई  : पुढारी ऑनलाईन 

शपथ घेताना नेत्यांनी नावे घेतल्यामुळे प्रोटोकॉलनुसार शपथ झाला नाही. त्यामुळे शपथविधी बेकायदेशीर असून तो रद्द करावी अशी मागणी भाजपने केली. शपथविधीपूर्वी नाव घेण्याची प्रथा भाजपची असल्‍याचे म्‍हणत राष्‍ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. 

नवाब मलिक यावेळी म्हणाले की, शपथविधीपूर्वी नेत्यांची नावे घेण्याची प्रथा भाजपची आहे. लोकसभा सदस्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली होती. असे असेल तर भाजपच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल. भाजपने दुसऱ्याकडे बोट दाखवने बंद करावे, असा टोला देखील नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.

फोडाफोडीचे राजकारण भाजपने करु नये, आम्ही जर आमदार फोडले तर भाजप रिकामा होईल. हिंमत असेल तर भाजपने मतदान घेऊन बघावे. ११९ आमदारही भाजपकडे नाहीत. सत्तेची लालसा दाखवून भाजपने नेत्यांना प्रवेश दिला. आज सत्ता बनत नसल्याने ते आमदारही आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. आमच्याकडे १७० चा आकडा आहे, असेही नवाब मलिक यांच्‍याकडून सांगण्‍यात आले.  

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. प्रोटोकॉलनुसारच शपथविधी घ्यावा लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकले. शपथविधीचीही एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. प्रोटोकॉलनुसार शपथविधी झाला नसल्याचे सांगत शपथविधी रद्द करण्यासाठी राज्यपालांकडे एका आमदाराने याचिका दाखल केली असल्याची माहितीही पाटील यांनी  दिली आहे. तसेच कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याची शक्यताही पाटील यांनी वर्तवली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारची आज (ता.३०) विधानसभेत शक्तिपरीक्षा होणार असून विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. 

Back to top button