मुंबई पुढारी वृत्तसेवा : उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा. अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज दिला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या २५ रुपयांच्या दैनंदिन उपनगरीय रेल्वे प्रवासाला आज एका व्यक्तीला २५० रुपयांहून अधिक खर्च होत आहे. डोंबिवली, ठाणे येथील लोकांना कामासाठी मुंबईत यायचं झालं तर रेल्वे सुविधा उपलब्ध नाही.
सुमारे ७०० ते ८०० रुपये टॅक्सी व खासगी वाहनांसाठी जात असून त्यांना नाईलाजस्तव महागडा रस्ते प्रवास करावा लागत आहे. बसने प्रवास करायचा झाला तरी मर्यादित बस फेऱ्यांमुळे तीन ते चार तासांचा वेळ प्रवासात जात असल्यामुळे नागरिकांचे प्रवास हाल होत आहेत.
राज्य सरकारने आतातरी तातडीने निर्णय घेऊन ज्यांचे लसीचे २ डोस पूर्ण झाले आहेत. त्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.
यावेळी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मार्केटमधील दुकानदार आदी हातावर पोट असलेल्या वर्गासाठी उपनगरीय लोकल उपलब्ध नाही. यामुळे हा प्रवासीवर्ग अडचणीत आला आहे.
महिन्याला १५-२० हजार रु.पेक्षा कमी उत्पन्न, त्यातच महागड्या प्रवासाचा भार यांमुळे घर चालवायचे? मुलांचे शिक्षण करायचे, की प्रवास खर्च भागवयाचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे आठवड्याभरात जर राज्य सरकारकडून या संदर्भात परवानगी दिली गेली नाही तर भाजपच्या वतीने बोरिवली, दादर, सीएसटी, चर्चगेट आदी प्रमुख रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला.