नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार हे राजकारणातले दिग्गज नेते आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत मी फार काही म्हणणार नाही. मात्र काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली, आणि त्यांनीच त्यावर डाका घातला असे कदाचित शरद पवारांना सुचवायचे असेल असा उपरोधिक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणला. एका खासगी वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी आजची काँग्रेस म्हणजे पडक्या हवेलीच्या जमीनदारासारखी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद दिवसभर उमटत राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. तर, काँग्रेसकडून देखील शरद पवारांच्या या विधानावर प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत, शरद पवारांवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.
नाना पटोले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना असे म्हंटले की, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या नाही गेल्या पाहिजेत. असं मोठ्या व्यक्तिमत्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे." असं नाना पटोले म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता १५ ते २० एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली होती. शरद पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांवर पलटवार केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिली. मात्र ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका घातला किंवा चोरी केली, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असे शरद पवार यांना म्हणायचे असेल. असे सांगत नाना पटोले यांनी शरद पवारांनाच टोला लगावला. दुसऱ्या पक्षाबाबत त्यांनी जी प्रतिक्रिया द्यायला नको असेही म्हणत नाना पटोले यांनी काहीशी नाराजीही व्यक्त केली. एवढेच नाही तर २०२४ ला काँग्रेसचाच पंतप्रधान होणार असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.
तसेच, "सामान्य जनता आजही काँग्रेस सोबत आहे. देशामध्ये भाजपाला एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेस नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा जो प्रयत्न केला जातो. हे आता कदापि कुणी मान्य करत नाही, काँग्रेस नेतृत्वचं २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होईल." असंही पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.