Nagpur Lok Sabha : नागपुरात भाजपचे शक्तिप्रदर्शन: गडकरी, पारवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल  | पुढारी

Nagpur Lok Sabha : नागपुरात भाजपचे शक्तिप्रदर्शन: गडकरी, पारवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल 

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी बुधवारी (दि.२७) नामांकन दाखल केले. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते खा प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.  Nagpur Lok Sabha
सुरुवातीला संविधान चौकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नितीन गडकरी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.  संविधान चौकात   ‘कहो दिल से… नितीनजी फिर से’,  अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आदी क्षेत्रांमधील संघटनांनी नितीन गडकरी यांचे ठिकठिकाणी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. Nagpur Lok Sabha
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी आकाशवाणी चौकात सभा झाली. या सभेने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. महिलांनी फुगडी खेळून तर युवकांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरून आनंद व्यक्त केला. या सभेला रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री श्रीमती सुलेखाताई कुंभारे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे आदींची उपस्थिती होती. खा.प्रफुल्ल पटेल यांनी नितीन गडकरी हे नागपूरचे नव्हे तर देशाचे वैभव असल्याचे गौरवोद्गार काढले.

Nagpur Lok Sabha ५ लाखांचे मताधिक्य द्या- गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझे कार्यकर्तेच मला लढण्याची ऊर्जा देतात,गेल्या दहा वर्षांमध्ये १ लाख कोटी रुपयांची कामे नागपूर लोकसभा मतदारसंघात झालीत. पण या कामांचे श्रेय माझे किंवा देवेंद्रजींचे नसून हजारो कार्यकर्त्यांचे आहे.  निवडणुकीत विजय निश्चित आहे.75 टक्के मतदानासह 5 लाख मतांनी मला निवडून द्या अशी विनंती केली.
दरम्यान, यंदा नितीनजी रेकॉर्डब्रेक मते मिळवून विक्रम प्रस्थापित करतील.  असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘नितीनजींनी गेल्या दहा वर्षांमध्ये जे काम केले आहे, तो केवळ ट्रेलर आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र आणि देश आणखी बदललेला असेल.’ या निवडणुकीत विरोधकांचे बारा वाजविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा 

Back to top button