जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 10 ) दुपारनंतर ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. तसेच कैर्‍या गळाल्याने आंबा उत्पादकांना फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे पडली. काही ठिकाणी घरांचे व गोठ्यांचे पत्रे उडाले. पावसामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांची धावपळ उडाली. दरम्यान वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना तापमानात घट झाल्यामुळे दिलासा मिळाला.

बेल्हे :

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी (दि. 10) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मागील काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला. मात्र आंबा बागांचे मोठे नुकसान झाले, तसेच शेताचे बांध देखील फुटले.

बेल्हे, आणे, नळवणे, पेमदारा, गुळुंचवाडी, बांगरवाडी, राजुरी, उंचखडक, गुंजाळवाडी या गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. गुळुंचवाडी व आणे गावच्या परिसरात हा पाऊस जास्त प्रमाणात झाला, त्यामुळे परिसरात रस्ते शेतात पाणी साचले. या परिसरात पावसामध्ये प्रचंड प्रमाणात वारे वाहिल्याने आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडाखाली कैर्‍यांचा सडा पडल्याचे दिसून येत आहे. तसेच काढणीला आलेले बाजरी, कांदा पीक तसेच जनावरांचा चारा झाकण्यासाठी शेतकरी वर्ग व वीटभट्टी व्यवसायिकांना मोठी धावपळ करावी लागली. तर काही प्रमाणात वीटभट्टींचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news